राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी, नाशिकसह इतर ठिकाणी गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान

| Updated on: Mar 01, 2020 | 11:12 AM

राज्यभरात शनिवारी (29 फेब्रुवारी) अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.

राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी, नाशिकसह इतर ठिकाणी गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान
Follow us on

मुंबई : राज्यभरात शनिवारी (29 फेब्रुवारी) अवकाळी पावसाने हजेरी लावली (Unseasonable Rain in Maharashtra). नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी आल्या. यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचा शेतीतील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधीच कर्जाच्या बोजाखाली असलेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सरकारच्यावतीने एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली असताना दुसरीकडे पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री अवकाळी पावसानं थैमान घातलं. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. विशेष करुन द्राक्ष उत्पादक आणि ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत पडला आहे.

सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्रीपासूनच विजेच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. मुख्यतः सोलापूर शहरासह बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि जिल्ह्यातील इतर काही भागात वादळी पाऊस झाला. यात द्राक्ष, ज्वारीसह हाताशी आलेल्या अन्य पिकांचं मोठं नुकसान झालं. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रविवारी (1 मार्च) सकाळच्या सत्रातही मोहोळ तालुक्यातील शेटफळ परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहर आणि तालुक्यातील काही भागात गारपीटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. ध्यानीमनी नसताना अगदी उन्हाळ्याच्या तोंडावर अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसात खळ्यात मळ्यात उघड्यावर असलेला कांदा भिजून खराब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. गहू, हरबरा आणि कांदा पीक देखील गारपीटीमुळे खराब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

औरंगाबाद आणि जालना येथे देखील अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमध्ये जोरदार पाऊस बरसला. यात हरभरा, गहू, करडी, तूर आणि ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका आणि इतर काही परिसरात अवकाळी पाऊस झाला.

Unseasonable Rain in Maharashtra