किरण मानेंचा बोलवता धनी कोण? चित्रा वाघ यांचा सवाल; तर ‘त्यांना सांगा मी आहे’, जितेंद्र आव्हाडांचं थेट आव्हान
मालिकेतील सगळ्या स्त्री कलाकारांनी किरण मानेंची बाजू घेतली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर एका स्त्री कलाकारांने आरोप केले होते.
मुंबई – अभिनेते किरण माने (kiran mane) यांच्या प्रकरणावरती आज जितेंद्र आव्हाड (jitendra awad) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आजच्या बैठकीला शिवसेनेचे खासदार अमोल कोल्हे (amol kolhe), स्टार प्रवाहचे कंटेट राईटर सतिश राजवाडे (satish rajwade) आणि किरण माने यांच्यात बैठक झाल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते म्हणतात की, तो एका शेतक-याचा मुलगा आहे, तसेच तो घराघरात पोहोचलेला मुलगा आहे. हे प्रकरण त्यांनी सामंजस्याने मिटवावे यासाठी मी या प्रकरणाचा पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मालिकेतील सगळ्या स्त्री कलाकारांनी किरण मानेंची बाजू घेतली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर एका स्त्री कलाकारांने आरोप केले होते. त्यानंतर इतर सहकलाकारांनी किरण बाजू घेतली आहे. त्यामुळे याला कुठलाही कसलाही रंग न लावता प्रोडक्शन हाऊसने सगळ्यांना एकत्र बसवून हा तिढा सोडवावा. तसेच कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असं जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
झालेल्या बैठकीत सतीश राजवाडेंनी मान्य केले की, प्रॉडक्शन हाऊसला घेऊन येतो. तिघेही एकत्र बसूया आणि यावर तोडगा काढूया. पुढची मिटींग दोन-तीन होईल त्यामध्ये योग्य तोडगा निघेल असंही आव्हाड यांनी सांगितलं.
एका सर्वसाधारण कुटुंबातून मुंबईत लढायला आलेला मुलगा आहे, तो किरण माने. त्याच्याकडे बागायती शेती सुध्दा नाही. त्याच्याकडे जिरायती शेती असलेल्या आई-वडिलांचा हा मुलगा आहे. मागच्या काही काळात अनेकांना चॅनेलने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे इथे कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी मी पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले.
या सगळ्या प्रकरणावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी टिका केली आहे, त्या म्हणतात किरण मानेंचा बोलवता धनी कोण? यावर उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांना सांगा मी धनी आहे म्हणून…मी भूमिका घेतलीय, किरण माने त्याच्या फेसबुक पोस्टवरून तो स्वत:चं बोलत होता. त्यामुळे याला उगाचं राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असं उत्तर त्यांनी चित्रा वाघ यांना दिलं.