दहावीतील विद्यार्थ्याने चौघा वर्गमित्रांवर चाकूने केले वार, संभाजीनगर हादरले
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याने वर्गातीलच चौघा सहकाऱ्यांवर धारदार पॉकेट चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना संभाजीनगरातील घडली आहे.

एका दहावीच्या विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने किरकोळ वादातून चार वर्गमित्रांवर हल्ला केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरातील देवगाव रंगारी येथील शाळेत घडली आहे. त्यातील एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जेवणाच्या सुट्टीत हात धुण्यासाठी रांगेत उभे असताना एका वर्गमित्राचा धक्का लागल्याचे निमित्त झाले आणि संतापलेल्या विद्यार्थ्याने चौघा जणांवर पॉकेट चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शाळेत अशा प्रकारे किरकोळ कारणातून विद्यार्थ्याने चाकूने वार केल्याने खळबळ उडाली आहे.
सकाळी ११.३० वाजता जेवणाची सुट्टी झाली. तेव्हा हात धुण्यासाठी रांग लागलेली असताना एका विद्यार्थ्यांचा धक्का लागल्याने त्याला इतर विद्यार्थ्यांनी जाब विचारला. आपल्या असा जाब विचारल्याने संतापलेल्या विद्यार्थ्याने थांबा तुम्हाला बघतोच अशी धमकी दिली. आणि काहीवेळा हा विद्यार्थी पॉकेट चाकू घेऊन आला आणि त्याने चौघा वर्गमित्रांवर वार केले.या घटनेनंतर हल्लेखोर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांच्या उजव्या दंडावर जखमा झाल्या तर एका उजव्या पायावर तर एकाच्या पाठीवर चाकूचे वार झाले आहेत. शाळा प्रशासनाने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने गावातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. तर गंभीर जखमी विद्यार्थ्याला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्यांना पाहून शाळा परिसरात एकच धावपळ उडाली. शाळा प्रशासनाने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, एका विद्यार्थ्याला गंभीर जखमा झाल्याने त्याला घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असे मारामारीचे लोण पोहचल्याने पालक, शिक्षक आणि समाजाचे अपयश म्हटले जात आहे. या प्रकरणात पॉकेट चाकू घेऊन वार करणाऱ्या विद्यार्थ्यांला ताब्यात घेतले असून आता त्याला समुपदेशन करण्यात येणार आहे.