Shiv Sena : आयपीएलसारखे प्राईस टॅगवाले लोक आपल्याला नकोत, नगरसेवकांच्या बैठकीत आदित्य ठाकरे आक्रमक, 10 मोठे मु्द्दे

| Updated on: Jun 24, 2022 | 11:38 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना संपर्कप्रमुखांसोबत, जिल्हाप्रमुखांसोबत, नगरसेवकांसोबत बैठकांचा धडाका उठवला आहे. यावेळी बोलतना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर आयपीएलच्या ऑक्शनसारखे विकले, असे शिवसैनिक आपल्याला नको म्हणत जोरदार हल्लाबोल चढवला आहे. 

Shiv Sena : आयपीएलसारखे प्राईस टॅगवाले लोक आपल्याला नकोत, नगरसेवकांच्या बैठकीत आदित्य ठाकरे आक्रमक, 10 मोठे मु्द्दे
आयपीएलसारखे प्राईस टॅगवाले लोक आपल्याला नकोत, नगरसेवकांच्या बैठकीत आदित्य ठाकरे आक्रमक, 10 मोठे मु्द्दे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने सध्या शिवसेनेला आणि राज्यातल्या राजकारणाला एक वेगळं वळण दिलं आहे. मात्र आत्ता या बंडाच्या नाट्यातही नवे ट्विस्ट येऊ लागले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे बंडखोर आमदारांना नोटीसा बजावणार असल्याची माहिती समोर आली आहे. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव तर पहिलंच आहे. त्यामुळे सोमवारपासून त्यांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी मुंबईत हजर राहवं लागणार आहे, असेही बोलले जात आहे.  तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेना संपर्कप्रमुखांसोबत, जिल्हाप्रमुखांसोबत, नगरसेवकांसोबत बैठकांचा धडाका उठवला आहे. यावेळी बोलतना आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर आयपीएलच्या ऑक्शनसारखे विकले, असे शिवसैनिक आपल्याला नको म्हणत जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या भाषणातले दहा मुद्दे

  1. गुवाहाटीला जे आमदार आहेत त्यातील 50 टक्के आमदार आजही आपल्यासोबत आहेत. कारण, त्यातील काहींना जेवणासाठी म्हणून घेऊन गेले आणि मग कैदी करुन नेलं, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
  2. उद्धव ठाकरे यांनी सात आठ दिवसांपूर्वी ही बंडखोरीची कुणकुण ऐकली होती. तेव्हा त्यांनी सर्वांना बोलावून मुख्यमंत्रीपद सोडण्याचीही तयारी केली होती, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
  3. आज त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण त्यांना भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही, असे म्हणत त्यांनी कायदेशीर मार्गही सांगितला आहे.
  4. तर ज्या आमदारांना उघड व्हायचं नाही. नितीशन देशमुख, कैलास पाटील यांनी कशा पद्धतीने त्यांना नेलं ते सांगितलं आहे, असे म्हणत त्यांनी बंडखोरांची व्यथाही मांडली आहे.
  5. हिंमत असती तर महाराष्ट्रात राहून सांगितलं असतं. सूरत किंवा गुवाहाटीत जाऊन काय बंड करता? शिवसैनिक होता तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलायला हवं होतं, असे थेट आव्हानही त्यांनी दिलं आहे.
  6. यापूर्वीच दोन बंड पाहिली तर पहिलं जे बंड होतं त्या सगळ्यांना पुढच्या निवडणुकीत आपण हरवलं होतं. त्यानंतर 2004 – 2005 मध्ये जे बंड झालं ते मी पाहिलं होतं आणि त्यांना पुढच्या दोन वर्षात आपण संपवलं होतं, असा इशाराही त्यांनी बंडखोरांना दिला आहे.
  7. आता प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी करायची आहे. ती कुणासोबत तर जे आपल्यासोबत राहिले ते आपल्यासोबत आणि जे येणार नाहीत ते विरोधक म्हणूनच आपल्याला लढायचं आहे, असे म्हणत त्यांनी शिवसैनिकांंमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम केलं आहे.
  8. अनेकदा अशी बंड होत असतात. अनेक बंड विरोधी पक्षातून सत्तेत जाण्यासाठी असतात पण हे एकमेव असं बंड आहे जे सत्तेतून विरोधात जाण्यासाठी आहे. काळजीचं कारण नाही आपल्यासोबत आकडेही आहेत आणि शिवसैनिकही आहेत, असाही दावा ठाकरे यांनी केला आहे.
  9. आजपासून पुढे जात असताना एक निर्धार आपण करायचा आहे. पुढच्या काही महिन्यात नगरपालिका, महापालिका निवडणुका लागल्या तर लढायचं कसं असा प्रश्न पडेल. पण काही सर्वे पाहिले तर आजही उद्धव ठाकरे यांची प्रतिमा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही, असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांसाठी रणशिंगही फुंकलं आहे.
  10. बंडखोरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजाराचा गैरफायदा घेतला. त्यांनी आपल्या स्वार्थासाठी हे पाऊल उचललं आहे. ज्यांना यायचं त्यांनी यावं, ज्यांना नको ते आम्हालाही नको आहेत. प्राईस टॅग लावलेले लोक आम्हाला नको. प्राईस लेस लोक आपल्याला हवे आहेत, असे म्हणत बंडखोवरही टीकेची तोफ डागली आहे.