बियर किंवा दारुचे दुकान सुरु करणाऱ्यांना दणका, सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मद्यविक्रीसाठी आता सोसायटीचे 'ना हरकत प्रमाणपत्र' आवश्यक असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली.

बियर किंवा दारुचे दुकान सुरु करणाऱ्यांना दणका, सरकारचा मोठा निर्णय
beer shop
| Updated on: Mar 11, 2025 | 4:32 PM

गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह महाराष्ट्रात दारुच्या दुकानांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे तरुण पिढी ही व्यसनाधिनतेकडे वळत आहे. तसेच जी दारुची दुकाने गृहनिर्माण सोसायटीत आहे त्यामुळेही कलह होत आहे. आता याच पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्ण घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

अजित पवार यांच्या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायट्यांमधील वातावरण कलहमुक्त राहण्यास, तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्यास प्रतिबंध होणार असून कायदा-सुव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. महापालिका वार्डमध्ये मद्यविक्रीचे दुकान बंद करायचे असेल नियमानुसार आलेल्या प्रस्तावावर झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान ज्या बाजूने होईल त्या बाजूने निर्णय होईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या या घोषणेचे समाजाच्या सर्व थरातून स्वागत होत आहे.

लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात मुद्दा उपस्थित

राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर आणि दारु दुकानांना परवानगी दिली जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा श्री. महेश लांडगे आणि अॅड. राहूल कूल या सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चर्चेत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले.

तर मतदानाद्वारे दारु दुकाने बंद करण्याचा कायदा

त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, शासनाची भूमिका राज्यात दारुविक्री वाढावी अशी नसून दारुबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आहे. अनेक दशकांपासून राज्यात दारुविक्रीचे परवाने बंद आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दारु दुकानांना परवानगी नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर मतदानाद्वारे दारु दुकाने बंद करण्याचा कायदा आहे. त्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी दारु दुकान सुरु किंवा बंद करण्यासाठी महापालिका वार्डांमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान हे ज्या बाजूने होईल, त्यानुसार निर्णय होईल.

राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन न देता अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही

राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका नसून अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. दारुमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. यासंदर्भत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.