अंबरनाथमध्ये महिला अकाउंटंटने संपवलं जीवन, हॉटेलच्या 310 रुममध्ये शेवटच्या तासाभरात काय घडलं?
अंबरनाथ येथील S-3 पार्क हॉटेलमध्ये तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी भगवान लोटेवर गुन्हा दाखल. मनी लॉंडरिंग आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप; वाचा सविस्तर बातमी.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुन्हेगारींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे महिला अत्याचार, लैंगिक शोषण यांसारखे गुन्हे दाखल होत असतानाच दुसरीकडे अंबरनाथमध्ये एका तरुण महिला अकाऊंटंटने आत्महत्या केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अंबरनाथमधील प्रसिद्ध S-3 पार्क या हॉटेलमध्ये तरुणीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पोलिसांनी कंपनी मालक भगवान लोटे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी IPC ३०६ कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी भगवान लोटे याच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती. १० एप्रिल रोजी भगवान लोटे याने तिला अंबरनाथ पश्चिम येथील S-3 पार्क हॉटेलच्या रूम नंबर ३१० मध्ये भेटायला बोलावले होते. त्या ठिकाणी दोघांमध्ये जोरदार वाद झाले. आरोपीने तिला प्रत्यक्ष भेटून, फोनवर आणि चॅटिंगद्वारे प्रचंड मानसिक त्रास दिला. या छळाला कंटाळून तरुणीने हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
बऱ्याच वेळानंतरही खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी संशयावरून दरवाजा उघडला. त्याचवेळी तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. या प्रकरणी आता विविध माहिती समोर येत आहे. या ठिकाणी केवळ प्रेमसंबंधांचाच अडसर नव्हता, तर आर्थिक गुन्हेगारीचाही समावेश असल्याचे समोर येत आहे. तरुणीच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, भगवान लोटे हा मृत तरुणीकडून ‘मनी लॉंडरिंग’ची बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराची कामे करून घेत होता. जेव्हा तिला या चुकीच्या कामाची जाणीव झाली आणि तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लोटेने तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला काम सोडू न देण्यासाठी तिचा मानसिक छळ करण्यात आला.
पोलीस कारवाई काय?
या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान लोटेची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. सुरुवातीला पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. मात्र आता त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असून त्याला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असे बोललं जात आहे.