परत जा, तिथे कमवा अन् खा..; मराठी सक्तीविरोधात रिक्षाचालकांच्या संपावरून हेमंत ढोमेनं सुनावलं
महाराष्ट्रात 1 मेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. याविरोधात 4 मे पासून 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार आहेत. त्यावर आता दिग्दर्शक हेमंत ढोमेनं सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचे परवाने येत्या 1 मे पासून रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा सरनाईकांनी दिला आहे. या निर्णयावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. इतकंच नव्हे तर मराठी सक्तीच्या विरोधात 4 मे पासून 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार आहेत. यावर विविध मराठी कलाकार प्रतिक्रिया व्यक्ती करत आहेत. एकीकडे अभिनेता रितेश देशमुखने सरनाईकांच्या निर्णयाचं समर्थन करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शिक हेमंत ढोमेनं संपावर जाणाऱ्या रिक्षाचालकांना सुनावलं आहे.
हेमंत ढोमेची पोस्ट-
’15 लाख आहेत म्हणजे.. मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं.. जिथे जमणार आहात तिथून तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा. तिथे कमवा आणि खा. महाराष्ट्रात मराठी बोला. शिका, प्रयत्न करा,’ अशी पोस्ट हेमंतने लिहिली आहे. मराठी भाषा टिकली पाहिज, जगली पाहिजे आणि वाढली पाहिजे.. अशी हेमंतची आधीपासूनचीच भूमिका आहे. याच भूमिकेतून त्याने ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा मराठी शाळांबद्दलचा आशयघन आणि तितकाच मनोरंजक चित्रपट बनवला होता. त्यामुळे भाषा सक्तीविरोधात संपावर जाण्याला त्याने ठाम विरोध केला आहे.

रितेश देशमुखनेही भाषा सक्तीचं समर्थन केलं आहे. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्यच असली पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो, तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी जो काही हा निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे”, अशी प्रतिक्रिया रितेशने दिली आहे.
राज्यात रिक्षा चालकांच्या परवान्यांची पुनर्तपासणी करताना कागदपत्रांसह चालक मराठी बोलतो की नाही, याचीही शहानिशा करण्याच्या सूचना प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिल्या आहेत. परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्यांचे तसंच मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यासाठी भाजपने मराठी शिकवणी वर्गसुद्धा सुरू केले आहेत. काही रिक्षा चालकांनी त्यासाठी मराठी भाषेचे धडे घेण्यासही सुरुवात केली आहे.
