Aurangabad Elections| औरंगाबाद महापालिका निवडणुकीची तयारी कुठवर? नव्यानं प्रभाग आराखडा तयार होणार, 17 मेपर्यंत मुदत!

| Updated on: May 11, 2022 | 12:23 PM

राजकीय पक्षांच्या सभांनी कार्यकर्त्यांमध्ये एकिकडे उत्साह संचारला आहे तर निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरु झाल्यानेही आता माजी नगरसेवकांना आनंद झाला आहे.

Aurangabad Elections| औरंगाबाद महापालिका निवडणुकीची तयारी कुठवर? नव्यानं प्रभाग आराखडा तयार होणार, 17 मेपर्यंत मुदत!
औरंगाबाद महापालिका
Follow us on

औरंगाबादः औरंगाबादः राज्यातील इतर महापालिका (Municipal corporation) निवडणुकांची प्रक्रिया जोमात सुरु असून औरंगाबाद महापालिकेची (Aurangabad corporation) निवडणूक मात्र तांत्रिक अडचणींमुळे रखडली होती. आता मात्र राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election commission) महापालिकेला नव्याने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच निवडणूक होईल, अशी आशा इच्छुकांना लागली आहे. येत्या 17 मेपर्यंत महापालिकेला नवा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करायचा आहे. त्यामुळे एवढे दिवस महापालिका निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांसमोरही आशेचा किरण निर्माण झाला आहे. राजकीय पक्षांच्या सभांनी कार्यकर्त्यांमध्ये एकिकडे उत्साह संचारला आहे तर निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरु झाल्यानेही आता माजी नगरसेवकांना आनंद झाला आहे.

आतापर्यंत काय प्रक्रिया?

20 एप्रिल 2020 पासून औरंगाबाद महापालिकेवर प्रसासक नेमण्यात आले आहेत. जानेवारी 2020 मध्ये महापालिका आणि राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या एक सदस्यीय वॉर्ड रचनेच्या प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर काही महिन्यांपूर्वीच सुनावणी झाली असून अंतिम निकालही लागला. महापालिकेच्या निवडणुकीतील हा सर्वात मोठा अडथळा होता. दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने नव्या निर्णयानुसार, औरंगाबादचा तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा आराखडा तयार करून घेतला. या आराखड्यावर आयोगाने अद्याप निर्णय घेतलेला नव्हता. दरम्यान, प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले. हा वादही कोर्टात गेला. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यानुसार आयोगाने पुढील प्रक्रिया सुरु केली आहे.

निवडणूक आयोगाचे काय पत्र?

राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी मनपाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वी सादर केलेल्या कच्च्या आराखड्याची तपासणी करण्यात आली. त्यात योग्य ते बदल करून प्रत्येक प्रभागाची सुधारीत लोकसंख्या, त्यात समाविष्ट होणारे प्रगणक गट दर्शवणारे विवरणपत्र 1 आणि 2 तसेच नकाशा सोबत जोडला आहे. त्यानुसार प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करून 17 मे पर्यंत राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवावा.

महापालिकेवर कुणाची सत्ता?

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यापूर्वी 2015 मध्ये झाली होती. या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळाले असले तरीही भाजप आणि एमआयएमनेही भरपूर जागा मिळवल्या. 2019 मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे संख्याबळही यंदा वाढण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या भीतीमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता 2022 मध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या पॅटर्ननुसार उमेदवार देणार की स्वबळावर लढणार, याबाबत आघाडीतच अद्याप संभ्रम आहे. तर भाजप, मनसे आणि एमआयएमनेही जोरदार तयारी सुरु केली आहे.