… तर उद्धव ठाकरेंच्या मार्गावर फुलांची उधळण करू, औरंगाबादेत MIM खासदार इम्तियाज जलील यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान!

| Updated on: Jun 01, 2022 | 3:08 PM

खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाववर येत्या 8 जून रोजी उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष तयारीला सुरुवात म्हणून ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सभेच्या ठिकाणी आज स्तंभ पूजन करण्यात आले.

... तर उद्धव ठाकरेंच्या मार्गावर फुलांची उधळण करू, औरंगाबादेत MIM खासदार इम्तियाज जलील यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः शहरातील पाणी प्रश्न गंभीर असून येथील नागरिकांना आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भुलवणं कठीण आहे, असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केलं आहे. येत्या 08 जून रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा औरंगाबादेत आयोजित करण्यात आली आहे. मात्र उद्धव ठाकरे शहराला पाणी देऊ शकणार नाहीत, फक्त औरंगाबादला येऊन ते धर्माचा आणि हिंदुत्वाचा (Hindutwa) मुद्दा काढणार आहेत. ज्या शहराला ते महान पुरुषाचं नाव देत आहेत, त्या शहराला दहा दिवसांनी पाणी मिळतं, याचा विचारही ते करत नाहीयेत, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी शहराला पाणी कधी मिळणार, याची नेमकी तारीख जाहीर केली तर ज्या मार्गाने ते जाणार आहेत, त्या मार्गावर फुलांची उधळण आम्ही करू, असं आव्हानही खासदार जलील यांनी केलं आहे.

खैरैंच्या आरोपाला सडेतोड उत्तर

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तीन दिवसांपूर्वी आरोप केला होता. एमयआएम आणि वंचित बहुजन आघाडीला भाजपने एक हजार कोटी रुपये दिले. निवडणुकीत शिवसेनेची मत खाण्यासाठी हे पैसे दिल्याचा खैरेंचा आरोप आहे. त्याला आज खासदार इम्तियाज जलील यांनी सडेतोड उत्तर दिलं. आम्हाला एक हजार कोटी रुपये नाही तर दहा हजार कोटी रुपये दिले होते. हे पैसे स्वतः चंद्रकांत खैरे यांनीच आणून दिले होते आणि त्यात 500 च्या चार नोटा कमी आल्या होत्या. चंद्रकांत खैरे यांनी चहा पाण्यासाठी त्या ठेवून घेतल्या होत्या. त्यांनी त्या अजून परत नाही केल्या. त्यामुळे त्यांनी त्या परत कराव्यात, अन्यथा आम्ही ईडीकडे तक्रार करू, असा इशारा खासदार जलील यांनी दिला आहे. तसेच पैसे दिल्याची काही माहिती खैरेंकडे असेल तर त्यांनी ईडीकडे तक्रार करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

‘उद्धव ठाकरे पाणी देऊ शकणार नाहीत’

येत्या 8 जून रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र शहरात प्रमुख समस्या पाण्याची आहे. उद्धव ठाकरे औरंगाबाद शहराला पाणी देऊ शकणार नाहीत, त्यामुळे ते पुन्हा औरंगाबादला येऊन धर्माचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा काढणार आहेत. ज्या शहराला महान पुरुषांचं नाव देत आहेत, त्या शहराला 10 दिवसांनी पाणी मिळतं, याचा विचार करत नाही, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

खैरेंच्या हस्ते सांस्कृतिक मैदानावर स्तंभपूजन

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेला आठ दिवस शिल्लक राहिले असताना शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून सभेची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्यक्ष तयारीला सुरुवात म्हणून ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सभेच्या ठिकाणी आज स्तंभ पूजन करण्यात आले. खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाववर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या हस्ते आज विधीवत स्तंभपूजन करण्यात आलं.