Aurangabad | नाथषष्ठीचा रांजण भरण्यास सुरुवात, कोण होणार या वर्षीचा श्रीखंड्या, काय आहे रांजणाची आख्यायिका?

ज्याच्या हातून रांजण भरतो, त्या व्यक्तीची श्रीखंड्या म्हणून पूजा केली जाते. अशी नाथांच्या रांजणाची आख्यायिका आहे. यावर्षीदेखील नाथांच्या वंशजांच्या हस्ते या रांजणात पाणी भरण्यास रविवारपासून सुरुवात झाली आहे. आता तो कुणाच्या हातून भरतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Aurangabad | नाथषष्ठीचा रांजण भरण्यास सुरुवात, कोण होणार या वर्षीचा श्रीखंड्या, काय आहे रांजणाची आख्यायिका?
पैठण येथील नाथांच्या वंशजांच्या हस्ते रांजणात पाणी टाकण्यास सुरुवात
Image Credit source: TV9 Marathi
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 22, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः अवघ्या विश्वाला आपल्या आचरणाने शांतीचा संदेश देणारे महान संत म्हणजे एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj). याच संत एकनाथांनी ज्या दिवशी जलसमाधी घेतली, त्या दिवसानिमित्त पैठणमध्ये नाथषष्ठीचा (Nathshashthi) मोठा उत्सव साजरा केला जातो. कोरोना काळामुळे मागील दोन वर्ष वारकऱ्यांचं (warkari) श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात नाथषष्ठीचा उत्सव जल्लोषात साजरा झाला नाही. मात्र यंदा तो साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तुकाराम बीजेपासून नाथांचा रांजण भरण्यासदेखील प्रारंभ झाला आहे. नाथांच्या वाड्यातील चौकोनी आकारातील या रांजणात पाणी भरण्यापासून नाथषष्ठी  उत्सवाला सुरुवात होते. हीच नाथषष्ठी यात्रेची औपचारिक सुरुवात मानली जाते.

464 वर्षांची परंपरा काय?

गावातील नाथवाड्यात विजयी पांडुरंगाची मूर्ती असून याच वाड्यात नाथांचे कायमस्वरुपी वास्तव्य होते. म्हणून या वाड्याला नाथांचा वाडा म्हणून ओळखले जाते. याच वाड्यात नाथ महाराज लोकांना जेवू घालत असत. त्यामुळे याच वाड्यात श्रीखंड्या म्हणजेच साक्षात पांडुरंगानेच 12 वर्षे गोदावरीचे पाणी वाड्यातील रांजणात भरले. हा रांजण मुख्य दर्शनी भागात चौकोन आकाराचा असून खाली गोलाकार आहे. तुकाराम बीजेला श्रीखंड्या म्हणजेच साक्षात पांडुरंग नाथांच्या घरी आले. त्याच दिवसापासून भगवान पांडुरंग कावडीने श्रीहरी नाथांच्या घरी गोदावरीचे पाणी आणून रांजण भरू लागले, अशी आख्यायिका आहे. या घटनेला काल 464 वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेला. तेव्हापासून आजही नाथभक्त हा रांजण भरण्यासाठी गोदावरीचे पाणी कावडीने आणून टाकतात.

नाथांच्या रांजणांचे वैशिष्ट्य काय?

नाथांसाठी पांडुरंगानं ज्या रांजणात पाणी भरलं, अशी आख्यायिका आहे, तो आजही नाथांच्या वाड्यात सुरक्षित आहे. हा रांजण 21 फुट खोल आणि दीड फूट रुंद असा पूर्ण काळ्या पाषणातला आहे. रांजणाच्या बुडात त्याच्या मधोमध गोमुख आहे. तिथून थेंब थेंब पाणी गोदावरीला जाऊन मिळते. कुठे मिळते, हे मात्र अजूनही कुणालाच माहिती नाही. त्या काळच्या स्थापत्य शास्त्रानुसार, साडेचारशे वर्षांपूर्वी बांधलेला हा रांजण आणि त्यावेळी खाली ठेवलेले छिद्र म्हणजे परक्युलेशन आहे. त्यामुळे पाणी झिरपत राहते व वरून झाकून ठेवल्यानंतरही ते खराब होत नाही.

श्रीखंड्याने भरले होते नाथांकडे पाणी

पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील रांजणाला पौराणिक महत्त्व आहे. साक्षात पांडुरंग, श्रीकृष्ण आणि उद्धवाने श्रीखंड्याच्या रुपात 12 वर्षे नाथांच्या घरी कावडीने पाणी भरले होते, अशी कथा नाथ चरित्रात आहे. नाथषष्ठी यात्रा महोत्सव सुरु होण्यापूर्वी फाल्गुन वद्य द्वितीयेच्या आदल्या दिवशी उघडा केला जातो. त्यातील पूर्वीचे पाणी उपसून गोदावरी पात्रात सोडून दिले जाते. रांजण कोरडा करून ऊन देतात. फाल्गुन वद्य द्वितीयेपासून नाथांच्या षष्ठीचा उत्सव सुरु होतो.

पैठण येथील रांजणाची पूजा

पंढरीत पांडुरंगाची, इकडे रांजणाची पूजा

तुकाराम बीजेच्या दिवशी ज्या वेळेला पांडुरंगाची पंढरीत पूजा सुरु होते, त्याच वेळी पैठणला या रांजणाची फूल आणि अक्षतांद्वारे पूजा सुरु होते. पंढरीत पांडुरंगाच्या खांद्यावर कावड आणि एका खांद्यावर घोंगडे ठेवले जाते. या दिवसापासूनच पैठण येथे आलेले नाथभक्त गोदावरी नदीचे पाणी रांजणात आणून टाकतात.

रांजण ज्याच्या हातून भरतो तो श्रीखंड्या

षष्ठीपासून सुरु झालेला रांजण भरण्याचा हा सोहळा पुढील चार-पाच दिवस सुरु असतो. नाथांच्या दर्शनासाठी येणारे हजारो भक्त आपापल्या परीने गोदावरी नदीतील पाणी या रांजणात आणून टाकतात. पण यापैकी एकाच व्यक्तीने पाणी टाकले की तो रांजण भरू लागतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मग कधी हा रांजण पहिल्याच दिवशी भरतो किंवा पाचव्या दिवशी भरतो. पण ज्याच्या हातून रांजण भरतो, त्या व्यक्तीची श्रीखंड्या म्हणून पूजा केली जाते. अशी ही नाथांच्या रांजणाची आख्यायिका आहे. यावर्षीदेखील नाथांच्या वंशजांच्या हस्ते या रांजणात पाणी भरण्यास रविवारपासून सुरुवात झाली आहे. आता तो कुणाच्या हातून भरतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

Amaravati Poisoning : अमरावतीत सकाळचं जेवण रात्री खाल्ल्याने 25 जणांना विषबाधा, चौघांची प्रकृती गंभीर

तेव्हा Urvashi Rautela ला भेटण्यासाठी Rishabh Pant ने 16 तास पाहिली होती वाट, नक्की काय घडलं होतं?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us