बचत गटाच्या माध्यमातून शेळ्या देण्याचे अमिष, औरंगाबादेत 150 महिलांची फसवणूक, दीड लाख उकळले, चौघांविरुद्ध गुन्हा

| Updated on: Oct 31, 2021 | 5:37 PM

संस्थेने 14 बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी नियमित रक्कम भरली, मात्र संस्थेने एकही शेळी दिली नाही. किंवा पैसेही परत केले नाही. त्यानंतर तब्बल एक लाख 47 हजार रुपये उकळून या संस्थेने गाशा गुंडाळल्याचे उघड झाले आहे.

बचत गटाच्या माध्यमातून शेळ्या देण्याचे अमिष, औरंगाबादेत 150 महिलांची फसवणूक, दीड लाख उकळले, चौघांविरुद्ध गुन्हा
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः बचत गटामार्फत (Self help group) शेळी पालनाचा व्यवसाय उभा करण्याचे अमिष दाखवून सुमारे 150 महिलांना फसवल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये (Aurangabad crime)  उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या चौघांमध्ये तीन पुरुषांसह एका महिलेचाही समावेश आहे.

राजमाता इंटरप्रायजेस नावाने होती संस्था

या प्रकरणी महिलांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याच्या नावाखाली सम्यक बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित राजमाता इंटरप्रायजेस या नावाने चौघांनी संस्था स्थापन केली होती. याच संस्थेच्या माध्यमातून महिलांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

1000 रुपये घेत 45 दिवसात शेळी देण्याचे अमिष

राजमाता इंटरप्रायजेस या नावाने संस्था स्थापन करणाऱ्यांमध्ये विकास मुळे, अमोल मोरे, विठ्ठल खांडेभराड आणि एक महिला यांचा समावेश आहे. यातील विकास मुळे हे संस्थेचे प्रमुख होते, असे सांगण्यात आले होते. यातील महिलेने गट समन्वयकाचत्या माध्यमाने प्रत्येकी दहा महिलांचे बचत गट तयार केले. प्रत्येक महिलेकडून प्रतिमहा एक हजार रुपये जमा केले जात होते. तर त्या मोबदल्यात 45 दिवसांनतर प्रत्येक महिलेला एक शेळी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. गट समन्वयक महिलांच्या माध्यमाने ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये 14 बचत गट तयार करण्यात आले होते. या बचत गटातील महिलांनी नियमित रक्कम भरली, मात्र संस्थेने एकही शेळी दिली नाही. किंवा पैसेही परत केले नाही. त्यानंतर तब्बल एक लाख 47 हजार रुपये उकळून या संस्थेने गाशा गुंडाळल्याचे उघड झाले आहे.

नोव्हेंबर ते डिसेंबर 2020 मध्ये पैसे घेतले

या संस्थेच्या नावाखाली चौघांनी गट समन्वयक महिलांकडून नोव्हेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत पैसे उकळण्यात आले. मात्र त्यानंतर ठरल्याप्रमाणे 45 दिवसानंतर शेळीही मिळाली नाही आणि पैसेही गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सिडको एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधत या महिलांनी तक्रार दाखल केली. 29 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या-

औरंगाबादः युरोलाइफ कंपनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, 100 कंत्राटी कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले

इथे दादागिरी खपवून घेणार नाही, औरंगाबादेत गुंठेवारी कारवाईच्या इशाऱ्यावरून शिवसेना आक्रमक