Beed Crime : बीडमध्ये विवाहितेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ! पतीला अटक, सासू-सासरे फरार

| Updated on: Aug 06, 2022 | 3:00 PM

बीडमध्ये विवाहितेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ, हत्या झाल्याचा माहेरच्या लोकांची तक्रार

Beed Crime : बीडमध्ये विवाहितेचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ! पतीला अटक, सासू-सासरे फरार
Follow us on

बीड : “तिचा वारंवार छळ व्हायचा… लग्न झालं तेव्हापासूनच घरात धुसपूस सुरू होती. नवरा शेतात काम करतो. तो दारू पिऊन तो तिला मारहाण (Beating) करायचा. अनेकदा तिने आमच्याजवळ बोलूनही दाखवलं. पण ‘संसार’ करायच्या नावाखाली ती पुन्हा तिच्या कामांमध्ये व्यस्त व्हायची. आधी तिला खूप एकटं वाटायचं. पण मग तिला दोन मुलं झाली अन् या सगळ्यात आयुष्यातील 7-8 वर्षे कधी निघून गेली कधी कळालंच नाही. या काळात तिला दोन मुलं झाली. मग कितीही भांडणं झाली, मारहाण झाली तरी ती मुलांकडे बघून पुन्हा उभी राहायची. मुलांसाठी आमि मुलांकडे बघून ती त्या घरात राहत होती. पण इतके दिवस सुरु असलेल्या अत्याचाराचं टोक त्यादिवशी गाठलं गेलं. सकाळपासूनच घरात भांडणं सुरु होती. आपण वेगळं राहुयात, असं तिनं आणि तिच्या नवऱ्यानं ठरवलं. मग दुपारी चार वाजता ती आमच्या नातेवाईकांशी बोलली होती. पण पुढच्या तासाभरात आम्हाला फोन आला. तिने आत्महत्या केली… पण हे कसं शक्य आहे. तिने काहीवेळा आधी फोन केला, तेव्हा तसं काहीच जाणवलं नाही. तसं तिला काही वाटत असतं तर ती बोलली असती, रडली असती… पण तसं काहीच झालं नाही. पण मग अवघ्या तास दिड तासात असं काय झालं? तिने आत्महत्या का केली? कश्यासाठी केली? हे सगळं कसं घडलं? हे सगळे प्रश्न आम्हाला सतावताहेत. पण तिने आत्महत्या केलेली नाही तर तिची हत्या झालीये”, असं अंजना राठोडचे (Anajna Rathod) वडिल बन्सी पेमा पवार (Bansi Pawar) यांनी त्या घटनेची पार्श्वभूमी सांगितली.

बीडच्या गेवराई तालुक्यात घडलेल्या घटनेने परिसर हळहळला आहे. गेवराईतील उमापूर गावात ठाकरी तांड्यावर अंजना सुनील राठोड यांचा झाडावर लटकलेला मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केल्याचं सासरी मंडळी सांगत आहेत. मात्र अंजना यांची हत्या झाल्याचा आरोप माहेरचे लोक करत आहेत. या प्रकरणी चकलांबा पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली. कलम 302, 498, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. यात अंजना यांचे पती सुनिल राठोड यांना अटक करण्यात आली आहे.

“सासरच्यांनीच हत्या केली”

“माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. तिची हत्याच झाली आहे. तिला तिच्या घरी मारण्यात आलं. मग तिला घराजवळच्या शेतातील लिंबाच्या झाडाला लटकवण्यात आलं. जेणे करून कुणालाही शंका येऊ नये की तिची हत्या झालीय म्हणून. पण जेव्हा तिला पाहिलं तेव्हाच मनात शंका आली की कदाचित काही घातपात झालाय. तिला ज्या झाडावर लटकलेलं पाहिलं तेव्हा वाटलं एवढ्या मोठ्या झाडावर ती कशी चढली असेल, जर ती चालून शेतात गेली तर तिच्या पायाला माती, चिखल लागायला पाहिजे होता, पण तसं काहीच नव्हतं. तेव्हाच वाटून गेलं की तिला मारण्यात आलंय…”, असं बन्सी पवार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

जेव्हा तिला मृतदेह आणण्यात आला. तेव्हा तिच्या सासरचं कुणीच तिथं आलं नाही. तिचे सासू-सासरे फरार आहेत. शिवाय अंजनाची दोन मुलंही त्यांच्याच सोबत आहेत. आम्हाला तिच्या मुलांची काळजी वाटत आहे. ते सुखरुप असावेत एवढंच वाटतं, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केलीय.

लवकरात लवकर अंजनाच्या मारेकरांना शोधायला हवं. तिच्या सासरच्यांचा शोध घेऊन त्यांना अटक झाली पाहिजे. तिचा पती, सासू सासरे या सगळ्या कटात सामील होते. त्यांना अटक व्हायला पाहिजे. हीच आमची मागणी आहे. या अटकेने माझी मुलगी परत येणार नाही. पण तिच्या आत्म्याला शांती तरी लाभेल, असं तिच्या वडिलांनी सांगितलं.