Special Report : भगतसिंह कोश्यारी आणि वाद, राज्यापालांची तीन वादग्रस्त विधानं आणि महाराष्ट्रात खळबळ, पाहा VIDEO

| Updated on: Nov 21, 2022 | 10:34 PM

पुण्यात राष्ट्रवादीनं डमी कोश्यारींचं धोतर फेडत आंदोलन केलं. उस्मानाबादेतही आंदोलकांनी धोतर फेडून प्रातनिधीक स्वरुपात अंत्ययात्रा काढली.

Special Report : भगतसिंह कोश्यारी आणि वाद, राज्यापालांची तीन वादग्रस्त विधानं आणि महाराष्ट्रात खळबळ, पाहा VIDEO
Follow us on

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्याचे पडसाद सलग तिसऱ्या दिवशी उमटले आहेत. विरोधकांबरोबरच शिंदे गट आणि उदयनराजेंनी सुद्धा राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. मात्र भाजपकडून राज्यपालांची पाठराखण होत असल्याचा आरोप विरोधक करतायत. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सुरु आहेत. पुण्यात राष्ट्रवादीनं डमी कोश्यारींचं धोतर फेडत आंदोलन केलं. उस्मानाबादेतही आंदोलकांनी धोतर फेडून प्रातनिधीक स्वरुपात अंत्ययात्रा काढली. अमरावतीत काँग्रेसनं धोतर पेटवून राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला.

बीडमध्ये राज्यपालांची टोपी आणणाऱ्याला एक लाखांची बक्षीस ठेवण्यात आलं. विरोधक राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींच्या हकालपट्टीसाठी आग्रही आहेत. मात्र भाजपनं दोन्ही नेत्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप होऊ लागलाय.

जेव्हा राहुल गांधींनी सावरकरांवर विधान केलं, तेव्हा आम्ही राहुल गांधींचा निषेध केला. मग आता भाजप राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदींचा निषेध का करत नाही, असा प्रश्न राऊतांनी विचारलाय.

या घडीला राज्यपालांना हटवण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, ठाकरे गट आणि शिंदे गटानंही केलीय. मात्र एकटी भाजप राज्यपालांची पाठराखण करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे.

वास्तविक भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत. उत्तराखंडातले ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष राहिलेत. ऊर्जा, जलसिंचन सारखी अनेक खाती त्यांनी सांभाळलीयत. दोन पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवकाचे स्वयंसेवक राहिलेले कोश्यारींनी पत्रकारिताही केलीय. त्यामुळे वारंवार वादग्रस्त विधानांमुळे काय पडसाद उमटू शकतात, याची कल्पना राज्यपालांना नव्हती का, हा सुद्धा प्रस्न आता पुढे येऊ लागलाय.

राज्यपाल चर्चेत येण्याची ही जवळपास नववी वेळ आहे.

पहिलं विधान होतं….छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांबद्दलचं…..
दुसरं विधान होतं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दलचं…..
तिसरं विधान होतं मुंबईतल्या गुजराती आणि राजस्थानींबद्दलचं…..

या वादग्रस्त विधानांबरोबरच लॉकडाऊन काळात भगतसिहं कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्रही देशभर गाजलं. घटनात्मक पदावर असणाऱ्या राज्यपालांनी मंदिरं बंद असण्यावरुन उद्धव ठाकरेंना थेट हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती.

“तुम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करता. मात्र, तुम्ही राज्यातील प्रार्थनास्थळं उघडणे पुढे ढकलता. का तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? ज्या शब्दाचा तुम्ही तिरस्कार करत होतात”, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं होतं.

राज्यपालांनीच पत्रात हिंदुत्व आणि सेक्युलरवादाचा उल्लेख केल्यामुळे हे पत्रही वादात आलं होतं.

तूर्तास राज्यपालांच्या वादात भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींचा भर पडलीय. आता या वादावर भाजप काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्वाचं आहे.