उद्धव ठाकरे, तोंडाच्या वाफा काढू नका, धमक असेल तर काँग्रेसपासून दूर व्हा, सावरकरांच्या भूमिकेवरून भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

52 काय 152 कुळं खाली आली तरी शिवसेना संपणार नाही, अशी गर्जना उद्धव ठाकरे यांनी मालेगावातील सभेत केली. भाजप नेत्याने आता या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

उद्धव ठाकरे, तोंडाच्या वाफा काढू नका, धमक असेल तर काँग्रेसपासून दूर व्हा, सावरकरांच्या भूमिकेवरून भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा
Image Credit source: social media
| Updated on: Mar 27, 2023 | 2:38 PM

सुनिल ढगे, नागपूर : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेहमी माझ्या कुळाचा उल्लेख करतात.आमचा बावनकुळे कूळ हिंदुत्ववादी आहे. पण तुम्ही तुमचा कूळ बुडविला आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत टीका केली. ५२ काय १५२ कुळे खाली उतरली तरी शिवसेना बुडवू शकणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या ज्या कुळाला उंची दिली होती. तो तुम्ही बुडविला आहे.. उद्धव ठाकरे तुम्ही ठाकरे कुटुंबाचं नाव बुडवत आहात, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच हिंमत असेल तर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसपासून वेगळं होऊन दाखवा, असं आवाहन त्यांनी केलंय.

ठाकरेपणा दाखवा, काँग्रेसची साथ सोडा

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतील काँग्रेसशी साथ सोडण्याचं खुलं आव्हान दिलंय. ते म्हणाले, ‘ एकदा तरी ठाकरेपणा दाखवा.. काँग्रेस पक्षाची साथ सोडा.. राहुल गांधी रोज सावरकरांचा अपमान करतात.. एकदा तरी ठाकरेपणा दाखवा आणि बाहेर पडा.. फक्त सभेतूनच वल्गना करू नका. …

काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पद भोगलं…

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे, ते मुख्यमंत्री असताना 50 वेळेला काँग्रेस पक्षांने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, टीका केली होती.. मात्र उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडले नाही… काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद भोगले. भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला.. नाना पटोले यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. उद्धव ठाकरे यांच्यात धमक असेल तर त्यांनी लगेच काँग्रेस पक्षापासून दूर होण्याचे जाहीर करावे, नुसत्या तोंडाच्या वाफा काढू नका, असा सल्ला बावनकुळे यांनी दिलाय.

मागच्या दाराने विधानपरिषदेवर गेले..

उद्धव ठाकरे यांनी आजवर एकही निवडणूक लढली नाही, यावरून बावनकुळे यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली. जे उद्धव ठाकरे कधी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढले नाही.. मागच्या दारावरून विधानपरिषद गेलेले उद्धव ठाकरे कशाला निवडणूक घेण्याची गोष्ट करतात.. ज्यांना निवडणूक लढण्याची सवय नाही.. त्यांनी निवडणूकीच्या गप्पा मारू नये.. जेव्हा केव्हा निवडणूक होईल आम्ही विधानसभेतील 200 जागा जिंकून येऊ, असा विश्वास बावनकुळे यांनी दर्शवला.