कामगारांची जबाबदारी घ्या, सरकार तुमच्यासोबत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उद्योजकांना आवाहन

| Updated on: Apr 04, 2021 | 5:10 PM

राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकार काहीतरी कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे (CM Uddhhav Thackeray on Lockdown).

कामगारांची जबाबदारी घ्या, सरकार तुमच्यासोबत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं उद्योजकांना आवाहन
CM Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकार काहीतरी कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे (CM Uddhhav Thackeray on Lockdown). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला लॉकडाऊनचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर त्यांनी प्रशासनातील अधिकारी, सिनेसृष्टीतील संघटना, जीम मालक संघटना आणि उद्योजकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली तर सहकार्य करावं, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यांच्या या आवाहनाला उद्योजकांनी पाठिंबा दर्शवला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उद्योजकांना काय सूचना?

1) वाढता कोविड प्रादुर्भाव पाहता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत
2) प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी
3) जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे
4) जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी
5) कोविड विरोधात लढतांना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू

संपूर्ण उद्योग जगत शासनासोबत, उद्योग जगताची ग्वाही

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतांना उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले (CM Uddhhav Thackeray on Lockdown).

उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांना सूचना

उद्योजकांनी राज्यात 24×7 लसीकरण व्हावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे, निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना कडक दंड लावावा, शिस्तबद्ध वर्तवणूक राहील यासाठी कडक नियमावली तयार करावी,  लोकांचा रोजगार सुरु राहील हे पहावे, जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होमच्या सुचना द्याव्यात, अशा विविध सूचना मुख्यमंवत्र्यांना दिल्या. तसेच शासन कोविड नियंत्रणासाठी करत असलेल्या अथक् प्रयत्नांचेही उद्योग जगतातील प्रतिनिधींनी अभिनंदन केले.

बैठकीला कोणकोण उपस्थित?

संबंधित बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, उद्योग विभागाचे डॉ. पी अन्बल्गन,  यांच्यासह उद्योजक सर्वश्री. उदय कोटक, अजय पिरामल, सज्जन जिंदाल, बाबा कल्याणी,हर्ष गोयंका, निखिल मेस्वानी, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, अपुर्व भट्टाचार्य, हर्ष गोयंका, बोमन इराणी, राजीव रस्तोगी, संजीव बजाज, मनदीप मोरे, इशान गोयल, अमित कल्याणी, अपूर्व देशपांडे, जफर खान, राजेंद्र गाडवे, आनंद गांधी, सिद्धार्थ जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

अनर्थ रोखायचा तर  अर्थचक्र बाधित होते आणि अर्थचक्र सुरु ठेवायचे तर अनर्थ होतो या कात्रीत आपण सापडले असून या संकटकाळात मित्र होऊन सोबत राहणे महत्वाचे असते, राज्यातील उद्योग जगताने नेहमीच मित्रत्वाच्या भावनेने शासनास आतापर्यंत मदत केली आहे, सहकार्य केले आहे त्याबद्द्ल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जिंदाल उद्योग समूहाने पुढे येऊन ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी शासनाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. बाब कल्याणी यांनी व्हेंटिलेटर्सची निर्मितीच नाही तर ते वापरण्याचे प्रशिक्षण आरोग्य कर्मचारी आणि तंत्रज्ञांना देण्याची तयारीही दाखवली आहे. ही मदत अमूल्य आहे. काही उद्योजकांनी त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेण्याचीही तयारी दाखवली आहे. आपण सगळ्यांचे लसीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधानांकडे तशी विनंती ही केली आहे. आपल्याच राज्याने 45 वर्षांवरील नागरिकांचे सरसकट लसीकरणाची मागणी केली होती. आता तुमची राज्यातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची मागणी ही पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू तसेच त्यासाठीच्या वाढीव लसींच्या डोसची मागणी करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

काही कडक निर्बंधांची निश्चित गरज

शासन लॉकडाऊनच्या बाजूने नाही, इंडस्ट्री चालू राहिलीच पाहिजे. पण ती चालू ठेवतांना काही कडक नियम लावणेही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. काही उद्योजकांनी स्थानिक वस्त्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक वर्तन होण्याच्या दृष्टीने स्वयंसेवक होऊन काम करण्याचीही तयारी दाखवल्याबद्दल आभार व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना त्यांच्या कामगारांना मास्क लावण्याची शिस्त लावण्याचे, त्यांच्या वेळोवेळी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले. हम सब एक है या भावनेने पुढे जातांना मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांचा एक ग्रुप तयार करण्याच्या सुचना मुख्य सचिवांना दिल्या. उद्योजकांच्या अपेक्षा आणि मागण्या समजून घेऊन वेळोवेळी त्यांच्याशी या ग्रुपद्वारे संवाद साधला जावा असेही ते म्हणाले.

हेही वाचा : रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन