उद्धव ठाकरेंना खूप मोठा झटका, दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाविरोधातील याचिकाच फेटाळली, आता पुढे काय?

| Updated on: Nov 15, 2022 | 4:52 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खूप मोठा झटका देणारी एक बातमी समोर आलीय.

उद्धव ठाकरेंना खूप मोठा झटका, दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाविरोधातील याचिकाच फेटाळली, आता पुढे काय?
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खूप मोठा झटका देणारी एक बातमी समोर आलीय. ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात निवडणूक आयोगाच्या शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. पण ही याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. ठाकरेंच्या गटाने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारीदेखील सुनावणी झाली होती. त्यानंतर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाची याचिकाच कोर्टाने फेटाळून लावली. पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवणं किंवा इतर निर्णय घेण्याचा सर्व अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं म्हणत दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे. दिल्ली हायकोर्टाच्या हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर काल जवळपास एक ते दीड सात सुनावणी झाली होती. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने ठाकरे गटाची भूमिका सविस्तर ऐकून घेतली होती. त्यानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

या सुनावणीदरम्यान कोर्टाने महत्त्वाची भूमिका मांडली होती. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाबाबतचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात टाकला होता. “आम्ही यावर निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या असं निवडणूक आयोगाला सांगू शकतो. तुम्ही याबाबत उद्या लेखी म्हणणं मांडा”, अशी सूचना दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला केली होती.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाची नेमकी भूमिका काय?

दरम्यान, दिल्ली हायकोर्टात उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून काल जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता. “मी पक्षाचा अध्यक्ष असून 30 वर्षांपासून पक्ष चालवतोय”, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली हायकोर्टात वकिलांमार्फत म्हणाले होते. “प्रथमदर्शनी जे दिसतंय त्यावर निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.

“निवडणूक आयोगाचे चिन्ह गोठवण्याचे आदेश बेकायदेशीर आहेत”, असं ठाकरेंचं म्हणणं होतं. “या निर्णयामुळे पक्षाची राजकीय कामं खोळंबली आहेत. मी माझ्या वडिलांनी दिलेलं नाव आणि चिन्ह वापरु शकत नाही”, अशी उद्धव ठाकरे यांची बाजू वकिलांनी कोर्टात मांडली.

“निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सगळ्या बाबी आम्ही पूर्ण केल्या आहेत. आम्ही सर्व कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र सादर केले. तरीदेखील निवडणूक आयोगाने हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला?”, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टात उपस्थित केला होता.

दिल्ली हायकोर्टाची नेमकी भूमिका काय?

ठाकरे गटाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने त्यांना त्यांची भूमिका लेखी स्वरुपात कोर्टात सादर करण्याची सूचना केली होती. तसेच आपण निवडणूक आयोगाला लवकरात लवकर निर्णय घेण्याची सूचना करु शकतो, असं सांगितलं होतं. त्यानंतर आज कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला आणि ठाकरे गटाची याचिकाच फेटाळली.