फडणवीस, जयंत पाटलांचा एकाच विमानातून प्रवास, चर्चेला उधाण, गुलाबराव पाटलांनी केलं मोठं विधान
देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. राजकीय वर्तुळात या विमान प्रवासाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विमानामध्ये काय कोणीही प्रवास करू शकतो. आता विमानामधून प्रवास करताना माझ्यासोबत राहुल गांधी देखील प्रवास करू शकतात. प्रवास करायला काय मनाई आहे का? असा सवाल यावेळी गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली नाही, यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा कार्यक्रमात व्यस्थ असतील त्यामुळे भेट झाली नसेल असं त्यांनी म्हटलं आहे. अमित शहा आले आणि ते भेट घेऊ शकत नाही असं होऊ शकत नाही, व्यस्त कार्यक्रमांमुळे भेट होऊ शकली नसेल, किंवा घेतली नसेल. भेट नाही दिली म्हणून काय होतं? एखादेवेळी भेट होत नाही, असं यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देखील यावेळी पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम असतो. ज्यांना वेळ दिलेली असते त्यांना ते भेटतात. उद्धव साहेबांनी पण वेळ माघावी. त्यांनाही भेटण्यासाठी वेळ मिळेल, असा टोला यावेळी पाटील यांनी ठाकरेंना लगावला आहे.
आज बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान कोसळून अपघात झाला आहे, यावर देखील गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही. भारतीय विमान प्राधिकरणाने कुठे कुठे अशा घटना घडतात त्यांची नोंद घेतली पाहिजे. आणि पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, त्यासाठी आवश्यक ती पाऊलं उचलली गेली पाहिजेत असं यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.