अब्दुल सत्तारांचा राजीनामा ठाकरे सरकारच्या पतनाची सुरुवात : देवेंद्र फडणवीस
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्यासआधीच सुरु झाली आहे” असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Abdul Sattar resign) म्हणाले.
वाशिम : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Devendra Fadnavis on Abdul Sattar resign) यांच्या राजीनाम्यावरुन ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. “अब्दुल सत्तार यांचा राजीनामा म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्यासआधीच सुरु झाली आहे” असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Abdul Sattar resign) म्हणाले. वाशिममध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार हे जनतेच्या कामासाठी झालं नसून,मलई खाण्यासाठी झालं आहे. आधी विस्तार होत नव्हता, मग नंतर खातेवाटप झाले नाही, आज तर एका मंत्र्यानेच राजीनामा दिला, म्हणजे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्यासआधीच सुरु झाली आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
यापुढेही असेच नाराज आमदार राजीनामे देऊन हे सरकार कोसळेल असा दावा यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सुधीर मुनगंटीवारांचं टीकास्त्र
“सत्तारांचे राजीनामानाट्य या सरकारचे खरे रूप दर्शविणारे आहे. यांना महाराष्ट्राच्या विकासाशी सोयरसुतक नाही, राज्यासाठी आता ‘मातोश्री’चे सेल झालेत डाऊन, बाप-बेटा मामा-भांजे की सरकार, आपले तत्व आणि आदर्श गुंडाळून ठेवणाऱ्यांची हीच अवस्था होईल”, असा घणाघात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप होण्याआधीच शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा (Abdul Sattar resigns as MOS) दिला.
राजीनामा मिळाला नाही – शिवसेना
दरम्यान, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा अद्याप मिळाला नाही, त्यांनी राजीनामा दिला नाही, असा दावा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केला. याशिवाय शिवसेना खासदार अनिल देसाई यांनीही अब्दुल सत्तार यांचा राजीनामा प्राप्त झाला नाही असं सांगितलं.
नाराज मूळचे शिवसैनिक नाहीत
जे नाराज आहेत, ते मूळचे शिवसैनिक नाहीत. बाहेरुन शिवसेनेत आले आहेत. त्यांना शिवसेनेत अडजस्ट होण्यास काहीसा वेळ लागत आहे. त्यापैकी अब्दुल सत्तार असावेत. ते पक्षात आले आहेत, त्यांना शिवसेनेने स्वीकारलं आहे. त्यांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. मरेपर्यंत शिवबंधन सोडणार नाही, असा शब्द अब्दुल सत्तार यांनी दिला होता. ते शब्द पाळणारे नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या
खातेवाटपाआधीच शिवसेनेला पहिला धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा
सावंत, सरनाईक ते सत्तार, शिवसेनेत नाराजांची फळी
नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाला, सत्तारांच्या राजीनाम्यावरुन गिरीश बापटांचे चिमटे