अयोध्या भूमी कमी होती का? जिथे रामलल्ला विराजमान होते तीच जागा का दिसली? : देवेंद्र फडणवीस

भाजप नेते माधव भंडारी यांच्या 'अयोध्या' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते (Devendra Fadnavis on Ayodhya book).

अयोध्या भूमी कमी होती का? जिथे रामलल्ला विराजमान होते तीच जागा का दिसली? : देवेंद्र फडणवीस
Chetan Patil | Updated on: Dec 22, 2020 | 8:11 PM

मुंबई : “खरंतर रामजन्मभूमीचं आंदोलन गेले अनेक शतकं सुरु होतं. 1528 साली बाबराचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येचं राम मंदिर तोडून मशिद बांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सातत्याने हे आंदोलन सुरु राहिलं. ज्या लोकांना वाटतं हा केवळ मंदिर आणि मशिदीचा वाद आहे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, अयोध्या भूमी कमी होती का? मशिद बांधण्यासाठी दुसरी जागा नव्हती का?”, असा सवाल भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजप नेते माधव भंडारी यांच्या ‘अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते (Devendra Fadnavis on Ayodhya book).

“केवळ राम मंदिर, जिथे रामलल्ला विराजमान होते, जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता तिच भूमी मीर बाकीला का दिसली असेल? याचं कारण एखाद्या समाजाला पराजित मानसिकतेत न्यायचं असेल तर त्या समाजाचा आत्मा मारावा लागतो. जेव्हा त्या समाजाचा आत्मा मरतो तेव्हा तो पराजित मानसिकतेत जावून तो गुलाम होतो”, असं फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis on Ayodhya book).

“त्यांना हे नेमकं माहिती होतं की, अतिशय समृद्ध संस्कृती लाभलेल्या या भारताला मिटवायचं असेल तर या संस्कृतीचा आत्मा प्रभू श्रीराम आहेत. त्यांना श्रीरामांचं मंदिर उद्ध्वस्त करुन एक संकेत द्यायचा होता की, तुमचा आत्मा जर आम्ही नष्ट करु शकतो तर आमची शक्ती बघा. तुमचे प्रभू श्रीरामदेखील तुम्हाला आमच्यापासून वाचवू शकत नाहीत. अशा प्रकारचा संकेत देवून एक प्रकारचा घाला त्यावेळी घातला गेला. हा केवळ मंदिर आणि मशिदीचा प्रश्न नव्हता”, असंदेखील ते म्हणाले.

“प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्णांनी जो वारसा दिलाय तो इतका समृद्ध वारसा आहे की, ज्या वारसाने आलेल्या प्रत्येकाला जागा दिली, दुनियेने ज्या लोकांना त्रस्त केले असे सर्व लोक भारतात आले. त्यांना भारताच्या हिंदू संस्कृतीने आपल्यामध्ये सामावून घेतलं, ज्यांनी आक्रमण केलं त्यांनाही सामावून घेतलं, जे आश्रयीत आले त्यांनाही सामावून घेतलं. म्हणून अशाप्रकारचा समृद्ध संस्कृतीवर जो घाला घालण्यात आला होता, त्याविरोधात ही लढाई होती. माधव यांनी साक्ष आणि पुराव्यांनी प्रत्येक गोष्ट पुस्तकात मांडली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“मी माधव भंडारी यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. रामजन्मभूमी संदर्भात संपूर्ण संशोधन करुन पौराणिक, संस्कृतिक आणि कायदा अशा सगळ्या अंगांनी परिपूर्ण असं हे पुस्तक आहे. इतिहासातील सर्व घडामोडींचा अभ्यास, ऐतिहासिक सर्व दाखले, वेगवेगळ्या संशोधकांचे पुरावे या पुस्तकात आहेत. विशेष म्हणजे यात कोणतंही राजकीय भाष्य नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन भारतात कुठेही आढळलेला नाही, घाबरण्याची गरज नाही : निती आयोग

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us