गीता, बायबल, कुराण पेक्षाही संविधान ग्रंथ महत्त्वाचा, शेवटच्या माणसाला जगण्याचा अधिकार मिळाला : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Feb 02, 2021 | 5:18 PM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संविधान ग्रंथ हा धार्मिक ग्रंथापेक्षा जास्त महत्त्वाचा ग्रंथ असल्याचं म्हटलं आहे (Devendra Fadnavis on Indian Constitution)

गीता, बायबल, कुराण पेक्षाही संविधान ग्रंथ महत्त्वाचा, शेवटच्या माणसाला जगण्याचा अधिकार मिळाला : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us on

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संविधान ग्रंथ हा धार्मिक ग्रंथापेक्षा जास्त महत्त्वाचा ग्रंथ असल्याचं म्हटलं आहे. ते कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या अनुसूचीत जातीच्या मोर्चाच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामांचं कौतुक केलं. यावेळी शेकडो कार्यकर्ते कार्यक्रमात हजर होते (Devendra Fadnavis on Indian Constitution).

“भाजपच्या अनुसूचीत जातीच्या मोर्चाच्या वतीने राज्य प्रस्थापित झालं पाहिजे यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबविले आणि आखले जात आहेत. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, असा या उपक्रमांचा ध्येय आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा कार्यक्रम यशस्वीपणा राबविला गेला, त्यामुळे अनुसूचित जातीच्या मोर्चाची जबाबदारी अत्यंत वाढली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis on Indian Constitution).

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितलं, माझ्याकरता गीता, बायबल, कुराण पेक्षाही महत्त्वाचा ग्रंथ असेल तर तो ग्रंथ म्हणजे भारताचे संविधान आहे. मी भारताच्या संविधानाची शपथ घेतली आहे. भारताचं संविधान जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलं ते संविधान जगाच्या पाठिवर उत्तम संविधान आहे. या संविधानाने देशाच्या शेवटच्या माणसाला जगण्याचा अधिकार दिला. देशामध्ये समतेचं राज्य तयार व्हावं, एकता, अखंडतेसह बंधुता निर्माण व्हावी आणि सर्वांना समान संधी मिळावी, अशाप्रकारची रचना संविधानात करण्यात आली आहे”, असं देवेंद्र फडणवीस कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले.

या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शरजिल उस्मानीवर सडकून टीका केली. “कुणीतरी शरजिल उस्मानी नावाचा हा सडक्या डोक्याचा इसम हा पुण्यात येतो, कुठल्या त्या एल्गार परिषदेत हिंदूना सडका म्हणतो. त्याविरोधात कोणतीही कारवाई होत नाही. हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात मोगलाई आहे का? शरम वाटायला पाहिजे सरकारला. गृहमंत्री चौकशी करण्याचं वक्तव्य करतात. तुम्ही कसली चौकशी करत आहात? व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय. जर या महाराष्ट्रात येवून हिंदूना सडकं म्हणत असेल तर भाजप चूप बसणार नाही. तात्काळ त्यावर गुन्हा दाखल केली नाही. तर त्याविरोधात आंदोलन सुरु करु. हा तोच व्यक्ती जो आम्ही बाबरी मस्जिद बांधू, असं बोलतो. ही परिषद फक्त आग ओकण्याकरता, वाद निर्माण करण्याकरता आणि समाजात तेढ निर्माण करण्यासाठी करण्यात येतं. यामध्ये सरकारची मिलीभगत आहे”, असा घणाघात फडणवीस यांनी केली.

शरजिल उस्मानीबाबत फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, सध्या शरजिल उस्मानी या तरुणाने पुण्यात एल्गार परिषदेत हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बाजप आक्रमक झाला आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत शरजिल विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शरजिल उस्मानी याने पुण्यात 30 जानेवारील रोजी एल्गार परिषदेत समस्त हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य आणि त्याच्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची गरज, अशा विषयावर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे

“एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करुन, शरजिलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करुन त्याला अद्दल घडवाल”, अशी अपेक्षा फडणवीस यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

शरजील उस्मानीचा वादग्रस्त व्हिडीओ

हेही वाचा : शिवरायांच्या महाराष्ट्रात हे कसं खपवून घेणार? शरजिल उस्मानीबाबत फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र