कर्जामुळे शेतकऱ्याची स्वतःचं सरण रचून आत्महत्या, मग कर्जमाफी कुणाला मिळाली?

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

राजू गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड : 34 हजार कोटींची कर्जमाफी केली, 151 तालुक्यात दुष्काळ घोषित केला, जलयुक्त शिवार योजनेचा डंकाही वाजवला. पण तरीही आपल्या राज्यात एका शेतकऱ्यावर स्वतःचं सरण रचून घेत आत्महत्या करण्याची वेळ आली. महाराष्ट्रासारख्या राज्यात शेतकऱ्यावर ही वेळ का आली आणि याला जबाबदार कोण यावर सरकारने विचार करण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्यातील […]

कर्जामुळे शेतकऱ्याची स्वतःचं सरण रचून आत्महत्या, मग कर्जमाफी कुणाला मिळाली?
Follow us on

राजू गिरी, टीव्ही 9 मराठी, नांदेड : 34 हजार कोटींची कर्जमाफी केली, 151 तालुक्यात दुष्काळ घोषित केला, जलयुक्त शिवार योजनेचा डंकाही वाजवला. पण तरीही आपल्या राज्यात एका शेतकऱ्यावर स्वतःचं सरण रचून घेत आत्महत्या करण्याची वेळ आली. महाराष्ट्रासारख्या राज्यात शेतकऱ्यावर ही वेळ का आली आणि याला जबाबदार कोण यावर सरकारने विचार करण्याची गरज आहे.

नांदेड जिल्ह्यातील तुराटी गावचे 60 वर्षीय पोतन्ना बलपीलवाड… तुम्हा-आम्हाला कल्पना करणंही शक्य होणार नाही, पण कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे पोतन्नांनी शेतात स्वत:चं सरण रचलं आणि आग लावून उडी घेतली. स्टेट बँक आणि को-ऑपरेटिव्ह बँकेचं तीन लाखांच्या कर्जाने स्वत:ला अग्नीत सामावून घेण्याची वेळ पोतन्नांवर आली. कर्जामुळे शेतकरी मरत असतील तर मग 34 हजार कोटींचं कुणाचं कर्ज माफ झालं हा मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर राज्यातील शेतकरी मागत आहेत.

पोतन्नांची कर्मावर आणि देवावर श्रद्धा होती. पण ना कर्म आडवं आलं..ना देव आडवा आला..दिवाळीत मुलगी घरी आली तर कपडे घ्यायला खिशात खडकूही नव्हता.

महाराष्ट्रात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सरकारची यादी एका संख्येने वाढली.. अधिकारीही पोहोचले आणि मदतीची भाषा करत आहेत. आता सवालही अनेक निर्माण होत आहेत.

जिवंत जळून मरण्याची वेळ शेतकऱ्यावर का येते? शेतकऱ्यांच्या आत्महत्या फडणवीसांना का थांबवता येत नाही? कर्जमाफी, दुष्काळ घोषित केला मग पण फायदा खरंच मिळाला का? 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची फक्त भाषाच का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात.

शेतकऱ्यांचं सरकार असल्याचा दावा करणाऱ्या सरकारची शेतकऱ्यांनाच आज चिड येत आहे. धडधड जळणाऱ्या आगीत आता शरीर शांत झालंय. सरकारी पंचनाम्यासाठी पुरावा उरला आहे. पण मुख्यमंत्री महोदय, या शेतकऱ्याचा बळी इतर शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढवणारा आहे.

संबंधित बातमी :

आधी सरण रचलं, मग पेटत्या चितेत उडी घेतली