मुस्लीम आरक्षण ते मंगळसूत्र, पंतप्रधान मोदींच्या आरोपात वास्तव काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. सभेत ते काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. या सभांना गर्दी देखील होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी आपली प्रचाराची लाईन बदलली आहे.
Loksabha election : पंतप्रधान मोदींकडून सध्या मुस्लीम आरक्षण आणि मंगळसूत्रावरुन काँग्रेसवर गंभीर आरोप होत आहेत. एससी, एसटींचं आरक्षण काँग्रेस मुस्लिमांना देणार तसंच मंगळसूत्रही काँग्रेस हिसकावून मुस्लिमांना देईल असं मोदी प्रत्येक सभेतून सांगत आहेत. मात्र खरंच काँग्रेसच्या जाहीरमनाम्यात असं काही आहे का ? काय तथ्य आहे. 2 दिवसांत मोदींनी महाराष्ट्रात तब्बल 6 सभा घेतल्या. सोलापूर, कराड, पुणे, माळशिरस, धाराशीव आणि लातूरमध्ये मोदींच्या सभेतून 2 मुद्दे कायम राहिले. एसटी एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कमी करुन, काँग्रेस मुस्लिमांना देणार आणि संपत्ती, सोनं मंगळसूत्र काँग्रेस हिसकावून मुस्लिमांना वाटणार असा आरोप त्यांनी केला आहे.
मोदी प्रत्येक सभेत या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत आणि त्यासाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचाच दाखल देत आहेत. आता खरंच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं काही आहे का ? तेही पाहणार आहोत.
मुस्लिमांच्या आरक्षणावरुन काँग्रेसच्या घोषणात्रात असं काही आहे का?
काँग्रेस अल्पसंख्यांना मिळणाऱ्या मुलभूत अधिकारांचा आदर करेल, आणि त्या अधिकारांना कायम ठेवणार. अल्पसंख्याक वर्गातील मुलं, मुलींना शिक्षण, रोजगार. खेळ आणि इतर क्षेत्रात फायदा घेण्यासाठी प्रोत्साहन देणार आणि मदत करणार. एससी एसटींचं आरक्षण काढून मुस्लिमांना आरक्षण देणार, असं घोषणापत्रात काहीही नाही.
मोदींच्या भाषणातील दुसरा कॉमन मुद्दा आहे, सोनं आणि संपत्तीचा. काँग्रेसची नजर संपत्ती आणि सोनं मंगळसूत्रावर असून काँग्रेस अधिकची संपत्ती हिसकावून घेणार आणि मंगळसूत्र आपल्या व्होट बँकेला वाटून देणार असं मोदी म्हणत आहेत.
काँग्रेसच्या घोषणापत्रात संपत्तीवरुन काय लिहिलंय, ते पाहा…
काँग्रेस आर्थिक-सामाजिक स्तरावर जातीय जनगणना करणार. जनगणनेच्या माध्यमातून काँग्रेस आर्थिक, सामाजिक स्थिती माहिती करेल. आणि आकडेवारीनुसार काँग्रेस त्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलणार. 2014 ते 2023 या कालावधीत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील असमानतेत वाढ झाली आहे. काँग्रेस ही असमानता दूर करणार. म्हणजेच इथंही एकाची संपत्ती किंवा सोनं दुसऱ्याला वाटणार असं काहीही नाही.
संपत्ती आणि मुस्लीम आरक्षणावरुन मोदी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर तुटून पडत आहेत. तर उद्धव ठाकरेंनी मोदींवर घटना बदलण्याच्या इराद्यावरुन निशाणा साधत आहेत.
भाजपकडून चारसौ पारची घोषणा देत पहिल्या टप्प्यात विकासावरुन जोरदार प्रचार झाला. काँग्रेसचा जाहीरनामा आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यापासून प्रचाराची लाईन बदललीय. प्रचारात हिंदू मुसलमान, संपत्ती आणि मंगळसूत्राची एंट्री झाली आहे.