Rain Update : मुंबईत रिपरिप, पुणे- नाशकातही काळे ढग, राज्यात कुठे पावसाचे आगमन, कुठे सरींची प्रतीक्षा
मराठवाडा आणि विदर्भासह आणि मुंबईसह कोकण भागात चांगला पाऊस झाला असला तर नांदेड, सोलापूर येथे पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण आहे.

राज्यात मुंबईसह कोकण पट्ट्यात आणि विदर्भातील काही भागात पावसाने पुनरागमन केले असेल तर नांदेड, सोलापूर या भागात पावसाने अजूनही ओढ दिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती आहे. आयएमडीच्या (IMD) मॉडेल अंदाजानुसार पुढील ३ दिवसांचा केलेला अंदाज पाहता, बदलेल्या हवामान प्रणालीमुळे गेल्या २४ तासांत उत्तर महाराष्ट्र ( मराठवाडा आणि विदर्भासह) आणि मुंबईसह कोकण भागात चांगला पाऊस पडला आहे, ही हवामानाची प्रणाली अतिशय वेगाने पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे उद्यापासून पावसाचा जोर पुन्हा कमी होऊ शकतो.
मुंबई आणि कोकणात पावसाने पुनरागमन केले आहे. रविवारची सकाळ आकाशात ढग येऊन अंधारुन आले होते आणि पावसाने एकीकडे आनंदाचे वातावरण असताना नांदेड आणि सोलापूर भागात दुष्काळाची परिस्थिती आहे.त्यामुळे कल्याण APMC मार्केटमध्ये पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे.आवक जास्त झाल्याने दरवर्षी १५० ते २०० रुपये किलोपर्यंत जाणाऱ्या फुलांचे भाव यंदा मोठ्या प्रमाणात घसरले आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कल्याण APMC फुल मार्केटमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. शेतकऱ्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रविवारी पाऊस झाल्याने अनेक फुले भिजल्यामुळे दर्जा घसरल्याने शेतकऱ्यांना फुले अवघ्या १५ ते २० रुपये किलोने विकावी लागली आहे. व्यापाऱ्यांकडून ताजी फुले ४० ते ५० रुपये किलोपर्यंत विकली जात आहे. मात्र, भिजलेली फुलेही कमी दरात खरेदी केली जात आहेत.
विरार येथे रात्रभर पाऊस
गणरायाच्या आगमनापूर्वी वसई – विरारमध्ये रात्रभर पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम सह अधूनमधून जोरदार पाऊस सलग सुरू आहे. सलग पडणाऱ्या पावसाने काही सखल भागात पाणी साचले आहे. आभाळ पूर्ण भरून आले आहे. दिवसभर असाच पाऊस सुरू राहीला तर गणरायाच्या आगमनात विघ्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
वर्धा जिल्ह्यात पावसाची रिपरिप
वर्धा जिल्ह्यात पावसाने हजेरी दाखवली असून सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. रात्रीच्या सुमारास काही भागांमध्ये जोरदार तर काही भागात मध्यम तसेच तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे. समुद्रपूर तालुक्यात सावंगी जवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद झाली आहे. पिंपरी जवळील नाल्याच्या पुरामुळे पिपरी ते गिरड रस्त्यावरील वाहतुक बंद झाली आहे. हा पाऊस पिकांना फायदेशीर ठरणार आहे. काही भागात पाऊस झाला असला तरी काही भागात मात्र केवळ ढगाळ वातावरण आहे.
माऊलीने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला
बीडच्या माजलगाव तालुक्यात अवर्षणाने संकटात सापडलेल्या सांडस- चिंचोली येथील शेतकरी माऊली कदम यांनी आपल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. पाऊस न पडल्याने सोयाबीनला शेंगाच न आल्यामुळे हताश होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेले गंभीर संकट पुन्हा एकदा समोर आले आहे.
गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात वाढ
गोसेखुर्द धरणाचे ७ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून ३३ हजार ८७६ प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदी-कालव्यात पाण्याची पातळी वाढणार आहे.
सोलापुरातील दुष्काळी परिस्थिती
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन या परिस्थितीची पाहणी केली. जून-जुलैमध्ये पेरणी झाल्यानंतर अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत पिकं करपू लागली आहेत. सोलापुरातील दुष्काळ परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची पथके शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवली आहेत.12 आणि 13 सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये या पथकद्वारे पाहणी होणार आहे. त्यानंतर दुष्काळसदृश्य परिस्थितीचा अहवाल शासनाला पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली आहे.
मालेगाव तालुक्यात ४० दिवसानंतर पाऊस
वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्रीपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील 70 टक्क्यापेक्षा अधिक पिकं आधीच करपून गेली आहेत. उर्वरित केवळ 30 टक्के पिकांनाच या पावसाचा फायदा होणार आहे. त्यातही सोयाबीन पिकाची दाणे भरण्याची अवस्था निघून गेल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे. जिल्ह्यातील कारंजा,मानोरा, मंगरुळपीर, वाशिम, मालेगाव या तालुक्यात तब्बल ४० ते ४५ दिवसानंतर पाऊस बरसला तर रिसोड तालुक्यात २५ दिवसानंतर पावसाचे आगमन झाले आहे.
४३ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धुळ्यात पावसाची हजेरी!
धुळे शहरात पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरू असून पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अचानक आलेल्या पावसाने गणेशमूर्ती विक्रेत्यांची तारांबळ उडाली आहे. काही पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र कपाशीच्या बोंडांवर रोगाची शक्यता व्यक्त होत आहे.
अंतरवालीत पाऊस
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी जोरदार पावसाची हजेरी झाली आहे. पावसामुळे जरांगे पाटीला यांच्या आंदोलनस्थळावरील मंडपात काही प्रमाणात पाणी साचले. मंडपात पाणी गळत असल्याने आंदोलकांची काही प्रमाणात गैरसोय झाली आहे.