
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर आता काँग्रेसने मोठे फेरबदल केले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवीन व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू अशी ओळख असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रात काँग्रेसला नवी भरारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. अखेर हा राजीनामा काँग्रेस वरिष्ठांकडून मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून विदर्भातील बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांची काँग्रेस विधानसभा विधीमंडळ पक्षनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे तरुण असल्यापासून गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (nsui) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केलेली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. ते युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित आयोजन करत असतात. शेती स्वावलंबनासाठी तसेच टंचाई मुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तसेच आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून ते सातत्याने प्रयत्नशील आणि कटीबध्द आहेत. 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. तसेच २०१४ ते २०१९ या कालावधीत ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विधानसभा सदस्य म्हणून राहिले आहेत.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन म्हणून कार्यरत आहेत. तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव, अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी सुध्दा पार पाडलेली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.
काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून देखील काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत. एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्या वतीने 1996 मध्ये जपान या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी 20 भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केलेले आहे.