महागाई 300 टक्क्यांनी वाढली आणि हे बोलतात ताजमहाल, ज्ञानवापी, पाकिस्तानवर.. संजय राऊतांच्या भाषणातील ४ महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सुरु आहे ते राज्य विस्कळीत करायचं, ते चालू द्यायचं नाही. असा विरोधकांचा सूर आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बघितला की यांच्या पोटात दुखायला लागतं. असंही राऊत म्हणाले

महागाई 300 टक्क्यांनी वाढली आणि हे बोलतात ताजमहाल, ज्ञानवापी, पाकिस्तानवर.. संजय राऊतांच्या भाषणातील ४ महत्त्वाचे मुद्दे
Sanjay Raut
Image Credit source: TV 9 marathi
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: May 28, 2022 | 9:12 PM

कोल्हापूर – देशात सध्या महागाई ३०० टक्क्यांवर (Inflation)पोहचली आहे, बेरोजगारी वाढते आहे, मात्र यावर बोलायचं सोडून भाजपाचे नेते (BJP leaders)हे ताजमहालखाली मंदिर आहे आणि ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi)जागी मंदिर आहे, असे सांगतात. मशीद आणि पाकिस्तानवर बोलतात, हिंमत असेल तर चीनवर बोलून दाखवा, असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी को्हापुरात दिलं आहे. ते कोल्हापुरात शिवसेनेच्या सभेत बोलत होते.

भाषण केलं तर ईडी मागे लावतात

सध्या भाषण करण्याचा मक्ता काहींनी घेतलेला आहे आम्ही बोललो की ताबडतोब ईडी, इन्कमटॅक्स मागे लागते, अशी टीका त्यांनी भाजपावर केली. पण शिवसेना झुकणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आमचे मंत्री अनिल परब यांच्या घरी काल ईडी गेली. कारण काय तर दापोलीतील जे रिसॉर्ट आहे त्याचं सांडपाणी दापोलीच्या समुद्रात जातं म्हणे. पण ते रिसॉर्ट अजून सुरुच झालेलं नाही. तुम्ही आर्थिक गुन्हे शोधणारी माणसं सांडपाण्यावर कुठे जाता. असा टोला त्यांनी केंद्र सरकार आणि ईडीला लावला.

राज्य विस्कळीत करण्याचा डाव

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सुरु आहे ते राज्य विस्कळीत करायचं, ते चालू द्यायचं नाही. असा विरोधकांचा सूर आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री बघितला की यांच्या पोटात दुखायला लागतं. असंही राऊत म्हणाले. पण सगळ्यांना पुरुन शिवसेना महाराष्ट्रात उभी आहे आणि उभी राहणार असल्याचं राऊत म्हणाले.

श्रीमंत शाहूंनी संभ्रम दूर कला

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचे आभार मानतो, असेही राऊत यावेळी म्हणाले. त्यांनी संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा संभ्रम दूर केल्याचे राऊतांनी सांगितले. शाहू महाराज यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांचा मुखवटा फाडला, असे राऊत म्हणाले. कोल्हापुरात आजही सत्य आणि प्रामाणिकपणा आहे हे छत्रपती शाहू महाराजांनी आज पुन्हा दाखवून दिलं. शिवसेनेनं छत्रपती घराण्याचा कधीही अपमान केला नाही, शिवसेनेनं छत्रपती घराण्याचा मान राखला. छत्रपती शाहू महाराजांचे हे वक्तव्य म्हणजे अंबाबाईचा प्रसाद आहे. भाजपवाल्यांनो आता तरी शांत व्हा आणि गप्प बसा. अशी टीका राऊतांनी केली.

भाजपने संभाजीराजेंचा वापर केला

फडणवीस कालपर्यंत म्हणत होते संभाजीराजेंची शिवसेनेनं कोंडी केली. आता त्यांची कोंडी झाली. सहावी जागा शिवसेनेची आहे. आम्ही त्यांना सन्मानाने बोलावलं आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा म्हटलंय. पण भाजपनं संभाजीराजेंचा वापर केला. समाजात द्वेष पसरवण्याचं काम केलं. पण आज शाहू महारांनी त्यांचा बुरखा फाडला. असं राऊत म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us