तुळजाभवानी देवीची सुरक्षा धोक्यात? CCTV कॅमेऱ्यावर संशयाची छाया, आमदाराच्या आरोपाने खळबळ
तुळजाभवानीच्या मंदिराचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मंदिराच्या सुरेक्षावर आमदार कैलास पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

श्रीराम क्षीरसागर, टीव्ही9 प्रतिनिधी
तुळजापूर मंदिर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. तुळजापूर मंदिराची सुरक्षा धोक्यात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुळजापूरच्या मंदिरात केंद्र सरकारने बंदी घातलेल्या चिनी कंपनीचे CCTV कॅमेरे बसवल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. कैलास पाटील यांच्या आरोपाने उद्घाटनाआधीच सीसीटीव्ही कमेऱ्यांवर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
तुळजापूर मंदिरातील सीसीटीव्ही कमेऱ्यांचं उद्घाटन होणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं उद्घाटन हे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहेत. परंतु या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कैलास पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. तुळजापूरची सुरक्षा धोक्यात आणत असल्याचा गंभीर आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. त्यांनी थेट मंदिर परिसरातील सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. देवीच्या मंदिराच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या कॅमेऱ्यांवरच आता संशयाची छाया पाहायला मिळत आहे. कॅमेरे नेमके कोणत्या कंपनीचे? केंद्राची बंदी लागू आहे का? आणि प्रशासनाने हे कॅमेरे बसवण्यास परवानगी कशी दिली? यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लूट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
‘आपण एकीकडे हिंदुत्ववादी सरकार म्हणून मिरवतो. दुसरीकडे हिंदूंच्या मंदिरामध्येच भाविकांच्या भावनेशी असं खेळलं जात असेल, तर याला पाठबळ कोणाचा आहे हे पाहणं गरजेचं आहे. अनेक मंदिरामध्ये लूट झालेल्या बातम्या येतात. त्याचप्रमाणे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली.
तुळजाभवानी मंदिराचा अजब कारभार
तुळजाभवानी मंदिरात अजब कारभार समोर आलाय. भाविकांनी देवीच्या दिव्यात अर्पण केलेलं तेल पुन्हा भाविकांनाच विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मंदिर परिसराच्या 200 मीटर अंतरात तेल विक्रीला निर्बंध असतानाही यज्ञ मंडप परिसरातच तेलाची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे 20 मिली तेलाची बॉटल तब्बल 20 रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेशी खेळ होत असल्याचा आरोप करत भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.