तर सातारची सून झालेल्या काश्मीरच्या कन्येचा प्रॉपर्टीवरचा हक्क अबाधित राहणार?

| Updated on: Dec 20, 2020 | 11:32 AM

काश्मीरमधील मूल निवासी तरुणीने राज्याबाहेरील तरुणाशी विवाह केल्यास तिला वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार मिळत नसे

तर सातारची सून झालेल्या काश्मीरच्या कन्येचा प्रॉपर्टीवरचा हक्क अबाधित राहणार?
Follow us on

सातारा : जम्मू काश्मीरमधील महिलने राज्याबाहेर विवाह केला, तर पूर्वी तिला वारसा हक्क आणि संपत्तीसंबंधी कोणतेच अधिकार मिळत नव्हते. मात्र सातारच्या सूनबाई झालेल्या सुमन भगतला (Suman Bhagat) आता आई-वडिलांच्या मालमत्तेवर पाणी सोडावे लागणार नाही. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या कराडच्या अजित पाटील (Ajit Patil) यांनी नुकताच काश्मीरच्या सुमनदेवीसोबत विवाह केला. (Kashmir Daughter will get parental property after marrying Satara Son)

काय होता कायदा?

काश्मीरमधील मूल निवासी तरुणीने राज्याचा मूल निवासी नसलेल्या तरुणाशी विवाह केल्यास 2002 पर्यंत तिला वडिलोपार्जित संपत्तीतील अधिकारही मिळत नसे. मात्र 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयाद्वारे हा भेद दूर केला. कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचाही जनतेला मोठा फायदा झाला आहे. त्यापूर्वी काश्मीरबाहेरच्या रहिवाशांना राज्यात मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी नव्हती. एखाद्या तरुणीने काश्मीरबाहेर लग्न केलं, तरी तिलाही मुभा नव्हती. एकप्रकारे लग्नानंतर तिचं काश्मीरचं नागरिकत्वच धोक्यात यायचं. मात्र कलम 370 हटवल्यानंतर कोणीही काश्मीरमध्ये मालमत्तेची खरेदी करु शकतो.

अजित पाटील काश्मीरचे जावई

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याचा फायदा सातारच्या पठ्ठयाला झाला आहे. कराडचे अजित पाटील आता काश्मीरचे जावई झाले आहेत. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या पाटलांनी काश्मीरच्या सुमनदेवीसोबत विवाह केला. आधी किस्तवाडमध्ये काश्मिरी पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली, तर नंतर कराडमध्ये महाराष्ट्रीय पद्धतीने काश्मिरी नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी करण्यात आली.

सरकारने जर 370 कलम हटवले नसते तर आम्ही लग्न करु शकलो नसतो. 370 कलम हटवल्याचा सर्वात जास्त फायदा मला झाला. माझ्यासाठीच कलम हटवल्याची भावना अजित पाटील यांनी व्यक्त केली.

साताऱ्याचा पुत्र आणि काश्मीरच्या कलीच्या प्रेमकहाणीचं लग्नात रुपांतर होण्यात मोठा अडथळा होता कलम 370 चा. यामुळे अजित आणि सुमन देवी काही महिने निराश होते. मात्र कलम हटवलं आणि अजितने लग्नाचा बार उडवून दिला. अजित यांचा विवाह 27 नोव्हेंबर 2020 रोजी मोजक्या कराडकर नातेवाईकांच्या उपस्थितीत जम्मू काश्मीरमधील पार पडला.

सोयरीक कशी जुळली?

अजित प्रल्हाद पाटील हा कराड तालुक्यातील उंडाळे गावातील रहिवासी. भारतीय सैन्य दलात सैनिकी शिक्षणाचे तो प्रशिक्षण देतो. सध्या तो झाशीत कार्यरत आहे. याच ठिकाणी राहणाऱ्या काश्मीरच्या सहकाऱ्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या जम्मू कश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावात राहणाऱ्या सुमन देवी भगतशी त्याची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांकडून प्रेमाचे अंकुर फुलले. (Kashmir Daughter will get parental property after marrying Satara Son)

अजित पाटील मार्च 2020 मध्ये सुमनच्या नातेवाईकासोबत 10 दिवसाच्या सुट्टीवर जम्मू काश्मीरला गेले होते कोरोनामुळे अचानक देशभर लॉकडाऊन जाहीर झाला आणि तब्बल तीन महिने सुमन देवीच्या घरी अजित पाटील यांना राहावे लागले. याच तीन महिन्यात अजित आणि सुमन यांचे नाते आणखी घट्ट झाले. सुमन देवी यांच्या कुटुंबीयांना अजित यांना जवळून समजुन घेता आले आणि सर्वांच्या संमतीने दोघांची लग्नगाठ पक्की झाली.

महाराष्ट्राच्या सूनबाई झालेल्या सुमनदेवी भगत बारावीचं शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील लोकांसह येथील राहणीमान तिला आवडलं. मुलींना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचं तिला मोठं अप्रूप वाटतं.370 कलम हटल्याने काश्मीरची नाजूक सुमन आणि मराठमोळा रांगडा अजित यांची प्रेम कहाणी विवाहाने संपली असली तरी सातारा जिल्ह्यात मात्र या लग्नाची गोष्ट अभिमानाने चर्चिली जात आहे.

काश्मीरच्या लेकीचा खास उखाणा वाचलात का?

(Kashmir Daughter will get parental property after marrying Satara Son)