कोल्हापुरातली महिला सरपंच लग्नासाठी वेडी, प्रियकराने हत्येसाठी केलं असं काही की… 400 किमीवर खळबळ
Kolhapur Crime : कोल्हापुरात एका महिला सरपंचाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून आरोपीने महिलेचा गळा आवळून खून केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला सरपंचाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून आरोपीने महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करताना मृतदेह सुमारे 400 किलोमीटर दूर भिवंडी येथे नेण्यात आला. मात्र, आरोपीच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याच्या नातेवाईकाला संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव सुरेखा शिवाजी न्यारे (वय 40) असे आहे. ही महिला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच होती. या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील याला अटक केली आहे. प्राथमिक तपासात सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. सुरेखा आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकत होत्या. याच कारणावरून दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. या वादातूनच आरोपीने हत्येचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
शेतात नेऊन गळा आवळून हत्या
समोर आलेल्या माहितीनुसार, 26 जुलैच्या सकाळी आरोपीने सुरेखा न्यारे यांना गावातील एका शेतात नेले. तेथे त्याने त्यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह आपल्या इको कारच्या डिकीत ठेवून तो विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे 400 किलोमीटर दूर भिवंडीतील कशेळी परिसरात राहणाऱ्या एका नातेवाईकाच्या घरी गेला.
नातेवाईकांना संशय आला अन्…
मंगळवारी पहाटे आरोपीच्या वागणुकीवर नातेवाईकाला संशय आला. त्यानंतर त्यांनी नारपोली पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेत कारची तपासणी केली. त्यावेळी कारमधून महिलेचा मृतदेह जप्त करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास कोल्हापूर पोलिसांकडे
नारपोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण कोल्हापूर पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. या घटनेच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र या घटनेमुळे शिरगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.