Ladki Bahin Yojana : पात्र नसतानाही लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेतले, आता काय शिक्षा होणार?
अनेक महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसताना देखील या योजनेंतर्गत लाभ घेतला आहे, आता केवायसीमुळे अशा महिलांची नावं समोर आल्यानंतर सरकारकडून मोठं पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे.

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला सरकारच्या वतीने दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र ही योजना सुरू करताना सरकारने काही अटी घातल्या होत्या, या अटींचं उल्लंघन करून देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली होती, पण चक्क पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान आता ज्यांनी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांवर आता सरकारकडून कारवाईला सुरुवात झाली आहे.
ज्या महिला इनकम टॅक्स भरतात, किंवा सरकारी कर्मचारी आहेत, अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर आता अशा लाभार्थ्यांकडून पैसे वसुलीला सुरुवात झाली आहे. दरम्यान ज्या महिलांनी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे? त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. सर्वात आधी तर अशा लाभार्थ्यांकडून त्यांनी आतापर्यंत या योजनेंतर्गत घेतलेल्या लाभाची वसुली होण्याची शक्यता आहे.
अशा लाभार्थ्यांची चौकशी करताना अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची दोन विभागामध्ये विभागणी करण्यात येत आहे, एक असे लाभार्थी ज्यांच्याकडून चुकून या योजनेचा लाभ घेण्यात आला तर दुसरे असे लाभार्थी ज्यांना कल्पना असून देखील केवळ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठीच त्यांनी आपली माहिती लपवली किंवा शासनाला चुकीची माहिती दिली, अशा लाभार्थ्यांकडून या योजनेचे संपूर्ण पैसे वसूल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच अशा लाभार्थ्यांचे पैसे ताबडतोब थांबवण्यात येणार आहेत. तसेच ज्या सरकारी कर्मचार्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून त्यांना या योजनेंतर्गत मिळालेले सर्व पैसे वसूल केले जाणार आहेत, त्याचसोबत प्रशासन स्थरावर देखील अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, निलंबनाच्या कारवाईची देखील शक्यता आहे. दरम्यान ज्या महिलांनी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी पोर्टलवर खोटी माहिती दिली, आधार कार्ड किंवा इतर दस्ताऐवजामध्ये फेरफार केली अशा महिलांवर आयटी कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे, त्यांच्याकडून पैशांची वसुली होऊ शकते.