Nana Patole | आघाडीत आणखी बिघाडी? राष्ट्रवादीनंतर पटोलेंच्या टार्गेटवर शिवसेना , OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा

नाना पटोले यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवेदनात्मक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी या आरक्षणाबाबत सरकारने वेगानं पाऊलं उचलावीत, अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडीचाच एक घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी असा इशारा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Nana Patole | आघाडीत आणखी बिघाडी? राष्ट्रवादीनंतर पटोलेंच्या टार्गेटवर शिवसेना , OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 3:07 PM

मुंबईः ओबीसी आरक्षणावरून (OBC reservation) महाविकास आघाडी सरकार वारंवार कोर्टात तोंडघाशी पडलं आहे. आरक्षणावरून सरकारची बाजू मांडणारा अॅडव्होकेट जनरल कुणाला आवडत असेल तर तो त्यांनी ठेवावा, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेला हा अप्रत्यक्ष इशारा असून ओबीसी आरक्षणावरून आक्रमक झालेल्या सर्व संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने नाना पटोले यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवेदनात्मक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी या आरक्षणाबाबत सरकारने वेगानं पाऊलं उचलावीत, अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडीचाच एक घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी असा इशारा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भंडारा-गोंदियातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाना पटोलेंनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे नुकतेच दिसून आले होते. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा देत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टार्गेट केलं आहे.

नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सर्व ओबीसी संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं असून त्यात त्यांनी म्हटलंय की, फडणवीस सरकार असताना 2017 पासून ओबीसींच्या राजकीय अधिकारावर घाला घालण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणाची कोर्टात काय अवस्था झाली आहे, ती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजात तीव्र आक्रोश आहे.

अॅडव्होकेट जनरल यांच्यावर नाराजी?

ओबीसी आरक्षणावरून सरकारची बाजू मांडणाऱ्या अॅडव्होकेट जनरल यांच्यावर नाराजी व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले, ‘ आपल्या राज्यातल्या अॅडव्होकेट जनरलच्या बाबतही अनेकदा भूमिका मांडली आहे. त्यांना त्यांनी ठेवावं. मात्र उद्या सुप्रीम कोर्टाच्या निकालात किंतु-परंतु येता कामा नये. नाहीतर ओबीसी समाजात रोष निर्माण होईल, एवढीच भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे.

केंद्र सरकारविरोधात पदयात्रा काढणार

दरम्यान, राज्यात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे मोठी पदयात्रा काढली जाणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले ,’ केंद्रानी आठ वर्षात देशाला बरबाद केलं. महागाई, बेरोजगारी, गरीबांचे प्रश्न वाढले. आमचे सगळे नेते पदयात्रा काढून केंद्र सरकारच्या अत्याचारी व्यवस्थेचं दर्शन याठिकाणी केलं जाईल. संघठनात्मक चर्चा व निवडणुकांमध्ये पक्षाला बळकटी कशी मिळेल, हेही पाहिलं जाईल.