पवारांचं ते विधान माझ्यासाठी धक्काच, शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय का घेतला असावा? जयंत पाटील म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिल्यानंतर माझ्यासाठी तो धक्का होता असं म्हणत अजित पवार यांच्या भूमिकेबाबत जयंत पाटील यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे.

पवारांचं ते विधान माझ्यासाठी धक्काच, शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय का घेतला असावा? जयंत पाटील म्हणाले...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne | Updated on: May 05, 2023 | 5:19 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला राजीनामा माझ्यासाठी धक्का होता. शरद पवार राजीनामा देतील याची कुणाला कल्पना देखील नव्हती, त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. राजीनाम्याची मला जर कल्पना असती तर माझी प्रतिक्रिया वेगळी असती असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. याच दरम्यान जयंत पाटील यांनी शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असावे असे माझे पहिल्यापासून मत असल्याचं म्हंटले आहे. शरद पवार हे देशाचे नेते असून विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी शरद पवार हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत. याशिवाय शरद पवार यांच्यासारखा प्रदीर्घ अनुभव असलेला नेता सध्या तरी देशात नाही, राज्यासह देशाला त्यांची गरज असल्याने शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडू नये असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी दिलेला राजीनामा एक मताने नामंजूर करण्यात आला. यानंतर सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन सर्व नेत्यांनी तुम्हीच पक्षाचे अध्यक्ष असावे अशी मागणी केली. कारण शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष असणं राज्यासह देशाची गरज आहे अशीच भावना प्रत्येकाने मांडली असं जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातीलच नेत्यांनी नव्हे तर देशातील अनेक नेत्यांनी शरद पवार यांना विनंती केली आहे. अध्यक्षपदापासून तुम्ही दूर जाऊ नका असे अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांना फोनवर विनंती केली आहे तर काहींनी प्रत्यक्षात भेट देखील घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार ह्या फक्त वावड्या आहे असं सांगत जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे. याशिवाय अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या राजीनाम्यावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी देखील शरद पवार यांनीच पक्षाचा अध्यक्ष असावं असं अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत मत मांडल्याचे जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.

याशिवाय शरद पवार यांनी त्यांच्या वयाचा विचार करून आणि नव्या पिढीच्या हातात पक्ष देऊन राज्यासह देशांमध्ये काम वाढवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा असा तर्क जयंत पाटील यांनी लावला आहे. याच दरम्यान जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकसंघ असून कोणीही कुठेही जाणार नाही असा दावा केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us