बोमईंच्या अंगात भूत शिरलय, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, कारण काय..?

| Updated on: Nov 24, 2022 | 9:40 PM

कर्नाटकच्या मुख्यमंत्री असो किंवा आणखी कुणी असो असा कोणीही दावा ठोकला तरी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही.

बोमईंच्या अंगात भूत शिरलय, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, कारण काय..?
Follow us on

मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर आता दावा सांगायला सुरूवात केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी काल सांगली जिल्ह्यातील चाळीस गावांवर दावा केला होता. तर आज त्यांनी थेट सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोटवर दावा सांगितला आहे. त्यामुळे आता राज्यातील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री बोमई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ते म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत शिरले आहे त्यामुळे ते वाटेल ती मागणी करत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे संजय राऊत यांनी जोरदार टीका करत शिंदे गटाला त्यांनी लक्ष्य केले आहे. ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना चाळीस आमदारांनी सोडली. त्यांचा तो स्वाभिमान आता कुठे शेण खातोय असा खोचक सवाल शिंदे गटाला त्यांनी केला आहे.

एक राज्य आमच्या राज्यातील गावांवर दावा करत आहे तर दुसरं राज्य आमच्या राज्यातील उद्योग खेचून घेऊन जात आहेत तरीही हे नेते षंडासारखे शांत का बसले आहेत असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर मात्र शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

तर त्यांच्या दाव्यानंतर आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना न्यायालयाचा दाखल देत सुनावले आहे.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सीमाप्रश्नी खटला चालू आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयापेक्षा तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री मोठे नाहीत.

आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री असो किंवा आणखी कुणी असो असा कोणीही दावा ठोकला तरी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. आमचा सीमाभाग आम्ही परत मिळवू असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा केल्यानंतर त्यांनी थेट सोलापूर आणि अक्कलकोट या गावांवर दावा केला असल्याने आता त्यांची मजल मुंबईवरही जाईल अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.