बदलापुरात चायनीजच्या दुकानातील नेपाळी कामगारांना शिवसेनेची मदत

| Updated on: Apr 28, 2020 | 9:49 AM

बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी सर्व कामगारांना दररोज दुपारी तयार जेवण पोहोचवण्याची तातडीने व्यवस्था केली. (Badlapur Shivsena helps Nepali Citizens)

बदलापुरात चायनीजच्या दुकानातील नेपाळी कामगारांना शिवसेनेची मदत
Follow us on

बदलापूर : लॉकडाऊनमुळे सध्या सर्व हॉटेल्स, चायनिजची दुकानं बंद आहेत. त्यामुळे अशा हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हीच गरज ओळखून बदलापुरात चायनीजच्या दुकानातील नेपाळी कामगारांना शिवसेनेने मदत केली. (Badlapur Shivsena helps Nepali Citizens)

बदलापुरात हॉटेल्स, चायनिजच्या दुकानात काम करणारे शेकडो कामगार राहतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात काही जणांना मालकांनी पगार दिला नाही. त्यामुळे या कामगारांचे पैसेही महिनाभरात संपले. अशावेळी काय करावं? या विवंचनेत असलेल्या कामगारांनी पत्रकारांना संपर्क साधला.

पत्रकारांनी ही बाब बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या कानी घातली. म्हात्रे यांनी या सर्व कामगारांना तातडीने अन्नधान्य पोहोचवलं. सोबतच दररोज दुपारी त्यांना तयार जेवण पोहोचवण्याचीही व्यवस्था केली.

हेही वाचा : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील धर्माबादमध्ये ‘गावकऱ्यांचे किचन’, 21 हजार गरजूंना रोज घरपोच जेवण

सध्या गावालाही जाऊ शकत नाही आणि मुलाबाळांना घेऊन उपाशीही राहू शकत नाही, अशी अवस्था असताना पत्रकारांनी बजावलेलं कर्तव्य आणि त्याला शिवसेनेची तत्परतेनं लाभलेली मदत, यामुळे या नेपाळी कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. (Badlapur Shivsena helps Nepali Citizens)

दुसरीकडे, तेलंगणा-महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यात ‘आपल्या गावकऱ्यांचे किचन’ हा उपक्रम राबवला जात आहे. यातून दररोज तब्बल 21 हजार गरजू नागरिकांना जेवणाची पाकिटे घरपोच पुरवली जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात धर्माबाद तालुक्याला आपलं अन्नछत्र लाभलं आहे.

तेलंगणा सीमेवरचा धर्माबाद तालुका विकासाच्या दृष्टीने अत्यंत मागासलेला आहे. या तालुक्यात मोलमजुरी करुन खाणारे जवळपास वीस हजार नागरिक राहतात. सध्या लॉकडाऊनमुळे या लोकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातून शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुबोध काकाणी यांनी ‘आपल्या गावकऱ्यांचे किचन’ हा उपक्रम सुरु केला.

सुरुवातीला काकाणी यांनी स्वतःच्या मित्रांच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची पाकिट पुरवली. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने गरजूंची संख्या वाढत गेली. त्यामुळे काकाणी यांनी शहरातील नागरिकांना श्रमदान करण्याची विनंती केली. काकाणी यांच्या आवाहनानंतर शेकडोंच्या संख्येने युवक, अधिकारी आणि कर्मचारी या किचनमध्ये श्रमदान करण्यास सरसावले.