मळके कपडे, दयनीय अवस्था! भाऊ डॉक्टर, वडील शिक्षक असूनही डॉक्टर होणाऱ्या मुलावर भीक मागण्याची वेळ, मन हेलावणारी घटना
२५ वर्षीय अभय सुरेश बेळकोनी हा गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून घरातून बेपत्ता झाला होता. पोलिसांनी जेव्हा त्याची आपुलकीने चौकशी केली, तेव्हा मन हेलावणारी घटना समोर आली आहे.

शिक्षक असलेले वडील, सरकारी रुग्णालयात डॉक्टर असलेला मोठा भाऊ आणि स्वतः होमिओपॅथीच्या (BHMS) तिसऱ्या वर्षात शिकणारा हुशार तरुण. अशा एका सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील २५ वर्षीय मुलगा अचानक मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना आढळल्याची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मात्र, मुंबईतील मालाड पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे आणि तत्परतेमुळे या तरुणाची सुखरूप सुटका होऊन त्याची त्याच्या कुटुंबाशी भेट झाली आहे.
पहाटेच्या कारवाईत पोलिसांना संशय आला अन्…
नांदेड जिल्ह्यातील तामसा गावचा रहिवासी असलेला २५ वर्षीय अभय सुरेश बेळकोनी हा गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून घरातून बेपत्ता झाला होता. मुंबईत भिकाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या एका कारवाईदरम्यान, मालाड येथील एस. व्ही. रोड परिसरात पहाटेच्या वेळी बीच मार्शल अंमलदार कोमलसिंग जाधव यांना एक तरुण अत्यंत थकलेल्या आणि हतबल अवस्थेत भीक मागताना दिसला. पोलिसांनी जेव्हा त्याची आपुलकीने चौकशी केली, तेव्हा त्याने “मला गावी जायचे आहे आणि त्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी मी गेल्या तीन दिवसांपासून भीक मागतोय,” असे सांगितले.
मोबाईल-बॅग चोरीला गेली आणि मानसिक संतुलन बिघडले
अभयची अवस्था पाहून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मालाड पोलिसांनी त्याला प्रेमाने खाऊपिऊ घातले आणि विश्वासात घेऊन चौकशी केली, तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर आले. अभय हा अभ्यासात प्रचंड हुशार असून त्याला बारावीत तब्बल ८० टक्के गुण मिळाले होते. सध्या तो होमिओपॅथीचे उच्च शिक्षण घेत होता.
दीड-दोन महिन्यांपूर्वी तो अचानक घराबाहेर पडला. ट्रेनने प्रवास करत तो आधी इंदूरला गेला आणि तिथून पुन्हा मुंबईत आला. मात्र, या प्रवासादरम्यान त्याची शैक्षणिक कागदपत्रे, पैसे आणि मोबाईल असलेली बॅग चोरीला गेली. घरातील सदस्यांचे संपर्क क्रमांक (Contact Numbers) हरवल्यामुळे तो प्रचंड घाबरला आणि त्या धक्क्यातून त्याचे मानसिक संतुलन बिघडले. पोट भरण्यासाठी आणि घराचा रस्ता शोधण्यासाठी अखेर तो रेल्वे प्लॅटफॉर्म, बसस्टॉप आणि रस्त्यांवर भीक मागू लागला होता.
पोलीस ठाण्यातच वडिलांनी मारली घट्ट मिठी
या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मालाड पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तातडीने नांदेडच्या तामसा पोलिसांशी संपर्क साधला आणि अभयच्या कुटुंबाचा शोध घेतला. अभय मुंबईत सुखरूप असल्याची माहिती मिळताच त्याचे वृद्ध वडील तातडीने मुंबईत दाखल झाले. मळके कपडे आणि अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या पोटच्या मुलाला समोर पाहताच वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी धावत जाऊन अभयला घट्ट मिठी मारली. योग्य वेळी मदत करून आपल्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवल्याबद्दल या सुशिक्षित कुटुंबाने मुंबई पोलिसांचे डोळे पुसत मनापासून आभार मानले आहेत.