आदित्य ठाकरेंचा ‘वरळी पॅटर्न’ माझ्या मतदारसंघात राबवा, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Apr 28, 2020 | 9:10 AM

वेसावे कोळीवाड्यात 'वरळी पॅटर्न' अंमलात आणा, अशी मागणी भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी पत्राद्वारे केली. (BJP MLA Bharati Lavhekar writes letter to CM asks to implement Worli Pattern in Versova)

आदित्य ठाकरेंचा वरळी पॅटर्न माझ्या मतदारसंघात राबवा, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us on

मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा ‘वरळी पॅटर्न’ माझ्या मतदारसंघात राबवा, अशी मागणी भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी केली आहे. मुंबईतील वेसावे (वर्सोवा) कोळीवाड्यात ‘वरळी पॅटर्न’ राबवण्यासाठी लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. (BJP MLA Bharati Lavhekar writes letter to CM asks to implement Worli Pattern in Versova)

वेसावे कोळीवाड्यात ‘कोरोना’ रुग्णांची रोज वाढती संख्या लक्षात घेता ‘वरळी पॅटर्न’ अंमलात आणा, अशी मागणी वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी पत्राद्वारे केली. गेले काही दिवस वेसावे भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.

‘वरळी कोळीवाड्या’मध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके रुग्ण सापडले होते. वेळीच काळजी घेतल्यामुळे वरळी कोळीवाडा कोरोनामुक्त झाला. वेसावे कोळीवाड्यात 38 रुग्ण आहेत. आपण वेळीच काळजी घेतली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती लव्हेकर यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

वेसावे कोळीवाड्याच्या हॉटस्पॉटच्या ठिकाणी मास स्क्रीनिंग आणि फिव्हर स्क्रीनिंगची व्यवस्था तातडीने उपलब्ध करुन दिल्यास संशयित कोरोना रुग्णाला शोधून त्यांचे अन्य ठिकाणी क्वारंटाइन करता येईल, अशी अपेक्षा लव्हेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

वरळी भागात राहणाऱ्या, वयाची नव्वदी पार केलेल्या आजींनी ‘कोरोना’वर मात केली आहे. आजींचा व्हिडिओ ट्वीट करत आदित्य ठाकरे यांनी ‘वरळी मॉडेल’ हा आशेचा किरण असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

‘वरळी मॉडेल आशादायी वाटत आहे. ‘कोरोना’ निगेटिव्ह ठरलेली 90 वर्षांवरील ही महिला आम्हाला प्रेरणा देते. त्यांनी ‘कोविड19’शी लढा दिला आणि आता त्या घरी परतल्या आहेत. आपल्याला हेच दाखवायचं आहे. माणुसकी म्हणजे दुसरं काही नाही, तर इतरांना प्रेरणा देऊन नेटाने उभे राहणे’ असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.