2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन: उद्धव ठाकरे

| Updated on: Dec 22, 2020 | 7:07 PM

"काही लोकांनी मला उद्घाटनाला बोलावलं, तुम्ही मला 2021, 2022 आणि 2050 मध्ये मुख्यमंत्री म्हणून मला बोलावलं तर मी कसं नाही म्हणणार?", असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केला.

2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन: उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : “काही लोकांनी मला उद्घाटनाला बोलावलं, तुम्ही मला 2021, 2022 आणि 2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून बोलावलं तर मी कसं नाही म्हणणार?”, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केला. त्यांच्या या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली. “हा एक विनोदाचा भाग झाला. मात्र, महाराष्ट्र सरकार नेहमी गुंतवणुकदार आणि उद्योजकांसोबत खंबीरपणे उभं राहील, असा मी विश्वास देतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते मॅगनेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक अधिकारी आणि गुंतवणुकदार उपस्थित होते (CM Uddhav Thackeray speech in Magnetic Maharashtra Program).

“सरकार तीन पक्षाचं आहे. या सरकारमध्ये मती आणि गती आहे. मती, गती आणि प्रगती असं हे सरकार आहे. नवीन गोष्टी येत आहेत. सध्या राज्यात समाधानकारक परिस्थिती आहे. काही प्रमाणात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण पाश्चिमात्य देशांमध्ये कोरोना स्ट्रेन प्रकार आढळला आहे. तिथला स्ट्रेन वेगाने पसरत आहे. पुढच्या काही दिवसात त्याची घातकता किती आहे याविषयी माहिती मिळेल. लस आली तरीही मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं जरुरीचं आहे. हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“पिझ्झा, आयस्क्रिम, तेल, गॅस, दूध, चीज सगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या येथे आहेत. मॅगनेटिक महाराष्ट्र म्हणजे मॅगनेटिक पॉवर आहेच, पण ती पॉवर कसली आहे, कशामुळे मॅगनेटिक शब्द वापरला तर ती पॉवर तुम्ही आहात. घराघरात लक्ष्मी जाते तेव्हा घरातील लोक कसे आहेत ते बघते. घरातील सदस्य समाधानी आहेत का की आपापसात लढत आहेत हे पाहत असते. घरात समाधानी वातावरण असेल तरच लक्ष्मी येते. तुम्ही सगळे आमच्या घरातली लोकं आहात. जिथे घरातच ताकद मिळते तिथे साहजिकच विदेशातील ताकद येणारच. घरातील येणारी ताकद ही हत्तीच्या बळासारखी असते”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“काम म्हणजे काम हे आपल्या अंगात भिनतं तेव्हा जी मॅगनेटिक ताकद आहे ती त्यामध्ये येते. महाराष्ट्रातील गुंतवणूक बाहेर घेऊन जाणं सोपं नाही. गुंतवणुकदाराचं महाराष्ट्रासोबत एक कौटुंबिक नातं निर्माण होतं. ते नातं मजबूत असतं. हे कुटुंब तुटू शकत नाही. माझ्या महाराष्ट्रातून कुणीही बाहेर जाऊ शकत नाही”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला (CM Uddhav Thackeray speech in Magnetic Maharashtra Program).

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील काही मुद्दे :

  • उद्योग विभागाने एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल देसाई साहेब आणि त्यांच्या टीमच अभिनंदन. मी त्यावेळेस 1 लाख कोटींचे उद्दीष्ट दिले होते. समाधान, अभिमान वाटेल असा हा क्षण आहे.
  • उद्योग मित्र ही संकल्पना छान आहे. देशाची प्रगतीची धारण महत्वाची. काम म्हणजे काम. हे जेव्हा आपल्या अंगी भिनेल तेव्हा महाराष्ट्र प्रगती करेल.
  • तुम्हाला विश्वास देतो. तुम्ही या संकटाच्या काळात देखील महाराष्ट्रात गुंतवणूक केली हे महत्वाचे आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत राहील.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या भाषणातील काही मुद्दे :

उद्योग करारांची हा तिसरा टप्प्या आहे. यापूर्वी दोन करार झाले. त्यावेळा मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते एक लाखाचा टप्पा कधी पार करणार, आज आम्ही एक लाखाचा टप्पा पार करत आहोत. खास बाब म्हणजे आज करार होत असलेल्या सर्व कंपन्या भारतातील आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची येथील उद्योजकांची इच्छा असल्याचे यावरून दिसून येते. यापूर्वी 29 करार झाले. त्यापैकी 21 उद्योजकांना जमीन दिली आहे. यापूर्वी अनेक करार झाले. परंतु आम्ही प्रत्यक्ष गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले.

गुंतवणूक वाढविण्यासाठी आम्ही प्रत्येक उद्योगासाठी रिलेशन मॅनेजरची नियुक्ती केली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. महाराष्ट्राला समृद्ध बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पूर्ण करणार. येथे रोजगार वाढावी, गुंतवणूक यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
आपण अस्सल मुंबईकर आहोत. अलीकडे काही फेरीवाले आले. त्यांनी अमिषं दाखवली परंतु महाराष्ट्रावर त्याचा काही परिणाम झाला नाही. आम्ही आघाडीवर आहोत.

हेही वाचा : उलटी गंगा वाहण्यास सुरुवात, नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश