दुपारी 3 पर्यंतची वेळ दिलेली, पण त्याआधीच कृती, मनसेच्या वॉर्निंगनंतर दादरमध्ये जैन धर्मीयांची पांढरी पट्टी हटवली

Sandeep Deshpande : जैन धर्मीयांच्या पांढऱ्या पट्टीवरुन दादर परिसरात मोठा वाद निर्माण झाला होता. दुपारी 3 पर्यंतची वेळ दिली होती. 3 पर्यंत पांढरी पट्टी काढा नाहीतर मनसे स्टाइलने उत्तर देऊ असा संदीप देशपांडे यांनी इशारा दिला होता.

दुपारी 3 पर्यंतची वेळ दिलेली, पण त्याआधीच कृती, मनसेच्या वॉर्निंगनंतर दादरमध्ये जैन धर्मीयांची पांढरी पट्टी हटवली
Controversy over Jain Community white strip
| Updated on: Jun 13, 2026 | 12:34 PM

दादरमध्ये जैन धर्मींयांनी आखलेली पांढरी पट्टी हटवण्यात आली आहे. जैन धर्मीयांच्या पांढऱ्या पट्टीवरुन दादर परिसरात मोठा वाद निर्माण झाला आहे. घाटकोपरमध्ये सुद्धा जैन धर्मीयांच्या या पांढऱ्या पट्टीवरुन वाद झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात पांढरी पट्टी काढली होती. त्यावरुन संदीप देशपांडे चांगलेच खवळले. त्यांनी इशारा दिला. दुपारी 3 पर्यंतची वेळ दिली होती. 3 पर्यंत पांढरी पट्टी काढा नाहीतर मनसे स्टाइलने उत्तर देऊ असा संदीप देशपांडे यांनी इशारा दिला होता. जैन धर्मीयांची ही पांढरी पट्टी म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांचं म्हणणं आहे. त्याचवेळी आम्ही आमच्या धर्मगुरुंच्या चालण्यासाठी ही पट्टी आखतो असं जैन धर्मीयांचं म्हणणं आहे. दादरमध्ये यावरून वातावरण तापत चाललं होतं.

मनसेच्या इशाऱ्यानंतर पुढील वाद टाळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ही पांढरी पट्टी हटवण्याचं काम सुरु झालं आहेत. राज ठाकरे यांचं यावर काय म्हणणं आहे, त्यावर संदीप देशपांडे म्हणाले की, “मूळात असे प्रकार खपवून घेऊ नका असा आदेश आहे. त्याचं आम्ही तंतोतंत पालन करतोय” तुम्ही म्हणता ही पट्टी आता काढली आहे, पण जैन धर्मीय म्हणतायत की, आम्ही चार-पाच वर्षांपासून अशी पट्टी काढतोय. “ते खोटं बोलतायत. मूळात सांस्कृतिक दहशतवाद करण्याचा प्रयत्न करतायत. आता चार-पाच वर्षापासून पट्टी मारतायत की सहा-सात वर्षापासून हा विषय इथे नाही. यामागचा उद्देश समजून घेतला पाहिजे. आमची दादागिरी इथे चालणार, असा उद्देश असतो, तेव्हा विरोध व्हायला सुरुवात होते असं संदीप देशपांडे म्हणाले.

हे यांची पाप झाकण्यासाठी कबुतरांना खायला घालणार

“मला एक कळत नाही, याचा धर्म यांना सांगतो की, ज्यामुळे लोकांना त्रास होईल ती गोष्ट रस्त्यावर करा. हे यांची पाप झाकण्यासाठी कबुतरांना खायला घालणार. त्याचा त्रास सहन करायचा आम्ही. रस्त्यावरची ही पांढरी पट्टी सिम्बॉलिक आहे. आज इथे केलं, उद्या तिथे करणार. हा सांस्कृतीक दहशतवाद करण्याचा प्रयत्न आहे. जो कायद्याच्या विरोधात जाणार त्याला आमचा विरोध असेल” असं संदीप देशपांडे म्हणाले.

 

Follow Us