30 हजार बेड, ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट, तिसऱ्या लाटेची तयारी, मुंबई महापालिकेचा ॲक्शन प्लॅन एका क्लिकवर

| Updated on: Aug 29, 2021 | 4:55 PM

तज्ज्ञांनी कोरोना विषाणूची तिसरी लाट सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबर महिन्यात येण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख रुग्ण आढळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

30 हजार बेड, ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट, तिसऱ्या लाटेची तयारी, मुंबई महापालिकेचा ॲक्शन प्लॅन एका क्लिकवर
BMC
Follow us on

मुंबई: देशातील कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. भारताला कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तज्ज्ञांनी कोरोना विषाणूची तिसरी लाट सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबर महिन्यात येण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 60 लाख रुग्ण आढळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका देखील कामाला लागली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेत मुंबई महापालिकेनं बेडची व्यवस्था आणि ऑक्सिजन प्लांटच्या निर्मितीवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील तयारीची माहिती दिली. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 30 हजार ऑक्सिजन बेड तयार केले जाणार आहेत. याशिवाय महालक्ष्मी आणि चेंबूर या भागात ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट बसवण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईतील रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होण्यास मदत होणार आहे. दुसऱ्या लाटेवेळी मुंबई महापालिकेनं 21 हजार बेडसची व्यवस्था केली होती.

टप्प्याटप्यानं सुविधा सुरु करणार

सुरेश काकानी यांनी दुसऱ्या लाटेच्या वेळी आम्ही आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा विवेकपूर्ण आणि योग्य पद्धतीनं वापर करण्याची गरज असल्याचं शिकलो. त्यानुसार जसजशी गरज पडेल त्याप्रमाणं सुविधा सक्रिय केल्या जातील, असंही सुरेश काकानी यांनी सांगितलं.

सरकारची तयारी काय?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकार बाधितांपैकी 12 टक्के लोकांना ऑक्सिजनची गरज लागते हे लक्षात घेऊन तयारी करत असल्याची माहिती दिली. राज्यातील ऑक्सिजनची उपलब्धता 2 हजार मेट्रिक टन करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले.

तिसऱ्या लाटेसाठी 1367.66 कोटी रुपयांची तरतूद

कोव्हिड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने 1367.66 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. कोव्हिड प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या या विशेष तरतुदीमुळे अत्यावश्यक गोष्टींसाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली

कोव्हिड-19 च्या संभाव्य लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत 1367.66 कोटी रुपयांची भरीव तरतूद केंद्र व राज्य शासनाने केलेली आहे, यात केंद्राचा हिस्सा 820.77 कोटी रुपये तर राज्य शासनाचा हिस्सा 547.18 कोटी रुपयांचा समावेश आहे. कुशल-अकुशल मनुष्यबळ, अत्यावश्यक औषधे, यंत्रसामग्री, कोव्हिड चाचणीसाठी आवश्यक किट्स, लहान मुले व नवजात शिशुंसाठी अतिदक्षता कक्षाची स्थापना, ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता, ऑक्सिजनच्या खाटा सज्ज ठेवण्याबरोबरच टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध करून करून देण्यात येत आहे.

इतर बातम्या:

बाहेर शिवसेना-राणेंमध्ये राडा, फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण

राजकारणात वातावरण बदल होतोय, काही विषाणुही येतायेत, आमच्यासाठी विषय संपला: आदित्य ठाकरे

Corona third wave Suresh Kakani said BMC will increased beds and install oxygen refilling plant