…तेव्हा हाजी मस्तान एक वर्षाचा होता : जितेंद्र आव्हाड

मुंबई : कोरेगाव भीमा विजय दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केला नसून, अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याने सुरु केला आहे, असे हिंदू जनजागृतीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. त्यानंतर एकबोटेंना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन एकबोटेंचा दावा खोडून काढला […]

...तेव्हा हाजी मस्तान एक वर्षाचा होता : जितेंद्र आव्हाड
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : कोरेगाव भीमा विजय दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केला नसून, अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याने सुरु केला आहे, असे हिंदू जनजागृतीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. त्यानंतर एकबोटेंना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन एकबोटेंचा दावा खोडून काढला आहे.
मिलिंद एकबोटे यांनी काय दावा केला होता?
कोरेगाव भीमा विजय दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केला नसून, अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याने सुरु केला होता, असे वादग्रस्त विधान मिलिंद एकबोटे याने केले आहे. एकबोटे हा हिंदू जनजागृती समितीचा नेता आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी असून, कोर्टात त्याने याच प्रकरणात प्रतिज्ञापत्र दिलं. त्यात त्याने हा वादग्रस्त दावा केला.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“कोरेगाव भीमाला 1 जानेवारी 1927 ला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘विजय दिन’ सुरू केला, तेव्हा हाजी मस्तान 1 वर्षाचा होता.” असे ट्वीट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. हाजी मस्तानची जन्मतारीख 26 मार्च 1926 आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटे याचा दावा किती खोटा आहे, हेच जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्वीटमधून उघडकीस आणले आहे.


इतिहासकार संजय सोनवणी काय म्हणाले?
कोरेगाव भीमा प्रकरणी मिलिंद एकबोटे याच्या दाव्यावर इतिहास अभ्यासकांनी टीका केली. एकबोटे याच्या विधानाचा निषेध करावा, असं आवाहन इतिहासकार संजय सोनावणी यांनी केला आहे. एक जानेवारी 1927 साली विजय स्तंभाला बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादनाला  सुरुवात केली. एकबोटे आयोगासह सर्वांची दिशाभूल करत आहे. हिंदुत्ववादी  इतिहासात काही तरी पिल्लू सोडून संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप सोनवणी यांनी केलाय. एकबोटे विकृत राजकारण करत असल्याचा आरोपही सोनवणी यांनी केला आहे.
काय आहे इतिहास?
1 जानेवारी 1927 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमाला विजय स्तंभाला भेट दिली होती. यानंतर नागरिक इथं येऊ लागले. 1857 बंडानंतर अस्पृश्यता समाजाची भरती बंद केली होती. मात्र यानंतर बाबासाहेबांनी भारतातील विजयात अस्पृश्याचं योगदान असल्याचं ब्रिटिशांना पटवून दिलं. त्यानंतर महार रेजिमेंट सुरु झाल्यानं अस्पृश्य समाजाला  मोठा आधार मिळाला तो यशस्वी लढा होता. 1927 पासून भिमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन सुरु झालं असून ती परंपरा कायम आहे. त्यामुळं श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न खोटारडा असल्याचे सोनवणी म्हणाले.
VIDEO : 

Follow Us