मुंबई-पुणे 31 मिनिटांत, फडणवीस सरकारची ‘हायपरलूप’ला मान्यता

| Updated on: Aug 02, 2019 | 12:20 PM

मुंबई : मुंबईहून अवघ्या अर्ध्या तासात पुणे गाठण्याचं स्वप्न येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार आहे. विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’ (Hyperloop) च्या माध्यमातून ही दोन शहरं केवळ 31 मिनिटांच्या अंतरावर असतील. महाराष्ट्र राज्य सरकारने ‘वर्जिन हायपरलूप’ (Virgin Hyperloop ) आणि ‘डीपी वर्ल्ड’ (DP World) यांच्या कराराला मान्यता दिली आहे. महत्त्वाकांक्षी असा जगातील पहिला हायपरलूप ट्रॅक मुंबई […]

मुंबई-पुणे 31 मिनिटांत, फडणवीस सरकारची हायपरलूपला मान्यता
Follow us on

मुंबई : मुंबईहून अवघ्या अर्ध्या तासात पुणे गाठण्याचं स्वप्न येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार आहे. विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’ (Hyperloop) च्या माध्यमातून ही दोन शहरं केवळ 31 मिनिटांच्या अंतरावर असतील. महाराष्ट्र राज्य सरकारने ‘वर्जिन हायपरलूप’ (Virgin Hyperloop ) आणि ‘डीपी वर्ल्ड’ (DP World) यांच्या कराराला मान्यता दिली आहे. महत्त्वाकांक्षी असा जगातील पहिला हायपरलूप ट्रॅक मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान सुरु होऊ शकतो.

हायपरलूप प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत तर होणार आहेच. मात्र हजारो तरुणांना हाय-टेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 36 बिलियन डॉलर म्हणजेच (अंदाजे 2 लाख 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) आर्थिक नफा होईल, असाही अंदाज आहे.

दादर-बोरीवलीपेक्षा कमी वेळेत

सध्या मुंबईहून पुणे गाठण्यासाठी साडेतीन तासांचा अवधी लागतो. भविष्यात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक व्यवस्था अधिक बिकट होण्याचा अंदाज वर्तवला जातो. अशातच मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेन (किंवा पॉड)ने केवळ 31 मिनिटांत हे अंतर गाठता येईल.

म्हणजेच, आजच्या घडीला संध्याकाळी पाच ते रात्री आठ या ‘पीक अवर्स’मध्ये सामान्यपणे दादरहून बोरीवली गाठण्यासाठी रस्ते मार्गाने जितका वेळ लागतो, त्याहीपेक्षा कमी वेळेत तुम्ही मुंबईहून पुण्याला पोहचाल. पुण्यातही वाहतुकीची समस्या नवीन नाही. हिंजवडीहून तुम्हाला कोथरुडला यायचं असेल, तर घड्याळाकडे न पाहिलेलंच बरं. त्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीला लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी कालावधीत तुम्ही दुसऱ्या शहरात असाल.

हायपरलूप म्हणजे नेमकं काय?

‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’च्या एलन मस्क यांनी हायपरलूप वाहतूक तंत्रज्ञानाची 2013 मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली. हायपरलूप वाहतूक व्यवस्थेसाठी कमी दाबाचा चॅनेल किंवा बोगदा तयार करायचा. अगदी कमी हवेच्या घर्षणासह खास डिझाइन केलेल्या ‘पॉड’मधून (ट्रेनसदृश) वाहतूक करायची. हे पॉड चाकांवर नव्हे तर हवेवर धावतील.

हायपरलूप व्यवस्था निर्माण करणं वाटतं तितकंही सोपं नाही. त्यामुळे अद्याप कोणत्याच शहराला यश मिळालेलं नाही. अबुधाबी आणि चीनमधील गिझाऊ प्रांताने ‘एचटीटी’ कंपनीची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. यूएसमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील हायपरलूप प्रकल्प मंदगतीने सुरु आहे.

आव्हानं कोणती?

हायटेक सस्पेन्शन, वीज कपात, हवेचे घर्षण यासारखी आव्हानं प्रामुख्याने हायपरलूप वाहतूक व्यवस्थेसमोर आहेत. यूकेमधील वाहतूक विभागाच्या मते आणखी दोन दशकं तरी प्रवासी हायपरलूप वाहतूक व्यवस्था अस्तित्वात येण्याची शक्यता दिसत नाही. मात्र वर्जिन आणि डीपी वर्ल्ड यांना भारतात येत्या सात वर्षांत हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा विश्वास आहे.

सुरुवातीला पुण्यात 11.8 किलोमीटरवर पायलट प्रकल्प राबवण्यात येईल. ‘वर्जिन’ पहिल्या टप्प्याचं काम येत्या वर्षअखेरपर्यंत सुरु होण्याची चिन्हं आहेत. 2023 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा इरादा आहे. ‘डीपी वर्ल्ड’ या टप्प्यात 500 मिलियन डॉलर (अंदाजे तीन हजार 471 कोटी रुपयांची) गुंतवणूक करणार आहे.