
इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून मालवाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. भारतातही एलपीजी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. याचा परिणाम आयआयटी मुंबई येथील हॉस्टेलच्या मेसवरही दिसू लागला आहे. गॅसची कमतरता लक्षात घेऊन हॉस्टेल मेसच्या मेन्यूमध्ये बदल करावा लागला आहे. काही पदार्थांवर चक्क बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नवीन मेन्यूनुसार सकाळच्या वेळी फक्त शाकाहारी पदार्थ दिले जाणार आहेत. अतिरिक्त नॉनव्हेज पदार्थ ठेवले जाणार नाहीत. याशिवाय मेन्यूमधून तळलेले आणि उकडलेले पदार्थ तात्पुरते काढून टाकण्यात आले आहेत. तसेच रात्रीच्या जेवणात मिठाईऐवजी मिल्कशेक किंवा आईस्क्रीम दिले जाणार आहे. दूध साधे किंवा थंड स्वरूपात दिले जाणार आहे. तसेच दुपारच्या व रात्रीच्या जेवणात फळे देखील दिली जाणार आहेत.
प्रशासनाने विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, ‘सध्याच्या युद्धस्थितीमुळे निर्माण झालेल्या एलपीजीच्या कमतरतेमुळे मेसमध्ये एलपीजीचा वापर कमी करणे आवश्यक आहे. देशातील आधीच मर्यादित असलेल्या एलपीजी साठ्यावर ताण कमी करण्यासाठी मेन्यूमधील काही पदार्थ तात्पुरते काढून टाकण्यात आले आहेत किंवा त्यात बदल करण्यात आले आहेत, कारण त्यांना शिजवण्यासाठी अधिक ऊर्जा लागते.’ तसेच आगामी काळात मेन्यूमध्ये आणखी बदल केले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार संस्थेच्या एका प्रवक्त्याने सांगितले की ‘ज्या पदार्थांना शिजवण्यासाठी जास्त वेळ किंवा अधिक गॅस लागतो, ते सध्या मेन्यूमधून काढले आहेत. मेन्यूमध्ये काही बदल होणे स्वाभाविक आहे. आम्ही आधीपासूनच बायोगॅस आणि वीजेचे पर्याय वापरत आहोत आणि आमच्याकडे काही एलपीजी साठाही आहे. मात्र तो संपून जाऊ नये म्हणून आम्ही आवश्यक पावले उचलत आहोत. तसेच ‘जेव्हा एलपीजीचा पुरवठा पुन्हा सामान्य होईल, तेव्हा नियमित मेन्यू पुन्हा सुरू केला जाईल’ अशी माहितीही देण्यात आली आहे.