महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट, मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदें गटात जाणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट, मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदें गटात जाणार?
मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदें गटात जाणार?
Chetan Patil | Updated on: Oct 29, 2022 | 10:52 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. गणेशोत्सवादरम्यान एकनाथ शिंदे हे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गेले होते. तसेच राज्य सरकारने महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली असली तरी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीदेखील आज मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. ‘आम्ही सदैव मिलिंद नार्वेकरांसोबत आहोत’, असं विधान उदय सामंत यांनी केलंय. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि खूप जवळचे निकटवर्तीय आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम पाहतात. नार्वेकर हे ठाकरे कुटुंबाचे एक सदस्यच आहेत असे त्यांचे संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केली तेव्हा मिलिंद नार्वेकर यांनी शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. ते शिंदेंना परत आणण्यासाठी सूरतला देखील गेले होते. याशिवाय शिवसेनेवर कोसळलेल्या राजकीय संकट काळात ते उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दरम्यान उदय सामंत यांनी केलेल्या विधानाने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

“आम्ही जरी आज त्यांच्यासोबत नसतो तरी मिलिंद नार्वेकर प्रत्येक माणसाला मदत करणारी व्यक्ती आहे. मलादेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आणण्यात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घडवून देण्यात मिलिंद नार्वेकर अग्रेसर होते. त्यामुळे आम्ही जरी शिंदेंसोबत असलो तरी मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल आमच्याकडून वाईट चितलं जाणार नाही. मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांनादेखील राजकीय ताकद दिली होती”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

ही शिंदे गटाची खेळी की राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू निकटवर्तीय आहेत. ठाकरे यांच्या पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्यांनी उद्धव यांची पाठराखण न करता शिंदेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबिय देखील उद्धव ठाकरेंच्या सोबत नाहीत हे दाखवून देण्यात शिंदे यशस्वी ठरले आहेत.

ठाकरे कुटुंबियांपाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते मिलिंद नार्वेकर यांचादेखील आपल्याला पाठिंबा असल्याचं कदाचित शिंदेंना जनतेला दाखवून द्यायचं आहे का? त्यासाठी त्यांनी मिलिंद नार्वेकरांच्या घरी जावून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं का? असेदेखील प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या विचारांचे सूर खरंच जुळले तर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका असू शकतो. तसेच यामुळे महाराष्ट्राच्या राजकाणात पुन्हा नवं समीकरण तयार होऊ शकतं. कारण नार्वेकर एकटे शिंदे गटात जाणार नाहीत. ते शिंदे गटात गेले तर शिवसेनेत पुन्हा खिंडार पडू शकतं. पण या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत. राजकारणात जे जाहीरपणे घडतं तेच खरं मानलं जातं. पडद्यामागच्या गोष्टी कितपत खऱ्या असतात, त्यांच्यात कितपत तथ्य असतं याची काहीच शाश्वती नसते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us