कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज, 1,367 कोटींची तरतूद

| Updated on: Aug 27, 2021 | 8:24 PM

कोव्हिड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने 1367.66 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज, 1,367 कोटींची तरतूद
corona
Follow us on

मुंबई : कोव्हिड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने 1367.66 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. कोव्हिड प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या या विशेष तरतुदीमुळे अत्यावश्यक गोष्टींसाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. (Maharashtra government ready to deal with the third wave of corona with provision of Rs 1367 crore)

कोव्हिड-19 च्या संभाव्य लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत 1367.66 कोटी रुपयांची भरीव तरतूद केंद्र व राज्य शासनाने केलेली आहे, यात केंद्राचा हिस्सा 820.77 कोटी रुपये तर राज्य शासनाचा हिस्सा 547.18 कोटी रुपयांचा समावेश आहे. कुशल-अकुशल मनुष्यबळ, अत्यावश्यक औषधे, यंत्रसामग्री, कोव्हिड चाचणीसाठी आवश्यक किट्स, लहान मुले व नवजात शिशुंसाठी अतिदक्षता कक्षाची स्थापना, ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता, ऑक्सिजनच्या खाटा सज्ज ठेवण्याबरोबरच टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध करून करून देण्यात येत आहे.

21 रुग्णालयांत 32 खाटांचे अतिदक्षता कक्ष

लहान मुले, नवजात शिशुंसाठी राज्यातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या 21 रुग्णालयांत 32 खाटांचे अतिदक्षता कक्ष उभारण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्हातील गडहिंग्लज येथेही अतिदक्षता कक्ष उभारण्यात येणार आहे. 36 ठिकाणी 42 खाटांचे नवजात शिशू व लहान मुलांचे अतिदक्षता कक्ष बनविण्यात येणार आहेत, त्यात कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय आणि इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 6 खाटांचे अतिदक्षता कक्ष निर्माण करण्यात येणार असून आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये देखील 20 खाटांचे अतिदक्षता कक्ष निर्माण करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

पूर्वीपेक्षा अधिकच्या उपाययोजना

राज्यामध्ये येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून पहिल्या दोन लाटांमध्ये जे अनुभव आले किंवा ज्याप्रमाणे उपाययोजना केल्या त्यापेक्षा अधिकच्या उपाययोजना राज्य शासन करीत आहे. जनतेने देखील कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून स्वतःचे व कुटुंबियांचे रक्षण करून राज्यात कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन शेवटी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.

इतर बातम्या

बाहेर शिवसेना-राणेंमध्ये राडा, फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण

राजकारणात वातावरण बदल होतोय, काही विषाणुही येतायेत, आमच्यासाठी विषय संपला: आदित्य ठाकरे

आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ; नारायण राणे कडाडले

(Maharashtra government ready to deal with the third wave of corona with provision of Rs 1367 crore)