महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम और अयोध्या का राम… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी घोषणा

महायुतीची शिवाजी पार्कवर सभा पार पडत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी घोषणा केली. त्यासोबतच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिंदे आपल्या भाषणात नेमकं काय काय म्हणाले? जाणून घ्या.

महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम और अयोध्या का राम... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी घोषणा
| Updated on: May 17, 2024 | 8:09 PM

एकीकडे देशभक्ती आहे. दुसरीकडे देशद्रोही विचार करणारे आहेत. त्यामुळे मोदी पाहिजे की… फिर एक बार…मोदी सरकार. आपल्याकडे आहे, महाराष्ट्र का काम, मोदीजी का नाम, और अयोध्ये का राम अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबईतील शिवाजी पार्कवर मैदानावर महायुतीची मोठी प्रचारसभा पार पडत आहे.

देशातील 140 कोटी जनता काय म्हणते, माझं मत मोदींना. कारण त्यांनी देश सुरक्षित ठेवलं. कारण त्यांनी गरीबांचं कल्याण केलं. त्यांनी भ्रष्टाचारा रोखला. त्यांनी अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. कारण लाभार्थ्यांचे पैसे जनधन खात्यात जमा केले. त्यांनी ८० कोटी जनतेला मोफत राशन दिलं. पाच लाखांचा आरोग्य विमा दिला. बेरोजगारांना काम दिलं. देशाला आत्मनिर्भर केलं. मोदी देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहे. देशाचा ऐतिहासिक वारसा जपत आहे, बाबासाहेबांचं संविधान जपण्याचं काम मोदींनी केलं. त्यामुळे देशाला कणखर देशभक्त प्रधानमंत्री पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उबाठाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुका लढवल्या. पण सरकार काँग्रेसबरोबर स्थापन केला. तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सोडला. मोदी म्हणाले, नकली शिवसेना. बरोबर आहे. तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाही. बाळासाहेबांचे विचार नाही. शिवसेना नाही, धनुष्यबाण नाही. आमच्याकडे शिवसेना आहे. तुमच्याकडे शिव्या सेना आहे. रोज शिव्या देणं एवढंच असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

याकूब मेमनचे आणि मुसाचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये दिसत आहे. मुंबईवरील हल्ला आठवा. मुंबईत शेकडो हजारो मुंबईकारांचे बळी गेले. रक्ताचे पाट वाहिले. त्यांच्यासोबत तुम्ही गेला. दहा वर्षात मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला. नाही झाला. होणारही नाही. मुंबईत काही झालं तरी मोदी घुस के मारेगा हे त्यांना माहीत आहे. मोदींनी पुलवामाचा बदला सर्जिकल स्ट्राईक करून घेतला. पाकिस्तानला माहीत आहे. मोदी आहे तर काहीच करता येणार नाही. मोदी गया तो गुजरात गया असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यामुळे मोदी पाहिजेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us