Bachu Kadu : मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण, आमदार बच्चू कडू मुंबई सत्र न्यायालयात हजर
या प्रकरणात सत्र न्यायालयमध्ये पुढची सुनावणी सहा ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. पुढच्या तारखेला मी आवर्जून उपस्थित राहणार असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
मुंबई : मंत्रालयात काही वर्षांपूर्वी झालेल्या अधिकारी मारहाण प्रकरणात आमदार बच्चू कडू आज हे मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले. 2011 चे जुने प्रकरण आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बच्चू कडू यांनी मंत्रालयाच्या एका सचिवाला मारहाण (eating Secretary) केली होती. त्या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील अनेक सुनावणीमध्ये बच्चू कडू हे काही कारणास्तव अनुपस्थित राहिले होते. कोर्टाने आज त्यांना उपस्थित राहण्यास आदेश दिला होता. आज उपस्थित राहिले नसते तर त्यांच्या विरोधात वॉरंट (Warrant) काढण्यात येणार होता. त्यामुळं बच्चू कडू प्रामुख्यानं हजर झाले. बच्चू कडू हे आज मुंबई सत्र न्यायालय विशेष न्यायाधीश राहुल रोकडे (Judge Rahul Rokde) यांच्या समोर हजर राहिले. या प्रकरणात सत्र न्यायालयमध्ये पुढची सुनावणी सहा ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. पुढच्या तारखेला मी आवर्जून उपस्थित राहणार असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
सरकार चांगले निर्णय घेतेय
बच्चू कडू सध्या एकनाथ शिंदे गटात आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागेल की नाही, त्यावर ते म्हणाले की वर्णी लागणे हे महत्त्वाचे नाही तर लोकांची कामे होणे हे महत्त्वाचे आहे. सध्या दोन मंत्र्यांनी बैठकीत चार-पाच चांगले निर्णय घेतले आहेत. त्याच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. कडू म्हणाले, लोकांना भरपूर अपेक्षा आहेत. वंचितांसाठी सरकार ताकदीने काम करेल. ते म्हणाले की लोकांचे कामे होत आहेत. यात विरोधकांनी समाधान मानलं पाहिजे. सरकार निर्णय चांगले घेत आहे.
चार-पाच दिवसात मंत्रिमंडळ विस्तार
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची धावपळ होत आहे. दोघेही जोमाने कामाला लागले आहेत. मंत्रीमंडळ विस्तारापेक्षा लोकांची कामं होणं महत्त्वाच आहे. तरीही चार-पाच दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा असल्याचं बच्चू कडू म्हणाले. आज बैठक असून या बैठकीमध्ये राष्ट्रपती निवडणूक कशाप्रकारे करावी. आगामी रणनीतीबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.