Raj Thackeray | राज ठाकरे यांची शिवरायांना साद, बघा नेमकं काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना साद घातली आहे. राज्याची आणि देशाची सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी शिवरायांना महत्त्वाची विनंती केली आहे.

Raj Thackeray | राज ठाकरे यांची शिवरायांना साद, बघा नेमकं काय म्हणाले?
Chetan Patil | Updated on: Jun 05, 2023 | 5:59 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात मुलाखत दिली. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमावेळी अवधूत गुप्ते यांनी राज ठाकरे यांना कोणत्याही एका व्यक्तीला फोन लावण्याची विनंती केली. आपल्या मनातल्या एखाद्या व्यक्तीशी फोनवर संवाद साधायला सांगितला तर तो कुणासोबत कराल आणि काय बोलाल? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना फोन केला. त्यांनी शिवरायांकडे पुन्हा महाराष्ट्रात जन्म घ्या, अशी विनंती केली.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“मी अगदी मनातलं बोलतोय. मला त्या गोष्टी कृत्रिमरित्या करता येत नाहीत. तुम्ही मला या गोष्टींची संधी दिलीय म्हणून मी ही गोष्ट करु इच्छितो. फोन लाऊ इच्छितो किंवा त्यांच्याशी बोलू इच्छितो. मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी बोलायचं आहे. माझी इच्छा आहे की, त्यांनी पुन्हा महाराष्ट्र आणि देशात अवतरावं. खासकरुन महाराष्ट्रात उतरावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला सांगावं की, तुम्ही (शिवरायांना उद्देशून) कशासाठी झगडलात? तुमच्या आयुष्यातली इतकी वर्ष तुम्ही कशासाठी घालवलीत? काय समजवण्यात घालवलीत? काय करण्यात घालवलीत?”, असं राज ठाकरे म्हणाले.

“औरंगजेबासारखा बादशाह तुमचे विचार मारण्यासाठी 27 वर्षे इथे महाराष्ट्रात राहिला आणि मेला. पण आम्हाला अजून कळत नाहीय की, तुम्ही कोण आहात, काय आहात, तुम्ही कशासाही महाराष्ट्र जगवलात? आम्हाला अजून समजत नाहीय, आम्ही फक्त तुमच्या पुण्यतिथी आणि जयंती साजरी करतोय. तुम्ही कोण आहात हे आम्हाला अजूनपर्यंत समजलेलं नाही”, असंही राज ठाकरे म्हणतात.

“महाराष्ट्राची सध्याची आताची परिस्थिती जी सगळी आजूबाजूला दिसतेय की आम्ही तुम्हाला हरवलंय, की तुम्ही आम्हाला समजत नाही आहात, तुम्ही आम्हाला कळत नाही आहात. अशी ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. त्यामुळे विनंती आहे की, पुन्हा एकदा या…’, अशी विनंती राज ठाकरे यांनी शिवरायांना केली.

राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या आठवणींवर बोलताना भावूक

या कार्यक्रमावेळी राज ठाकरे यांना एक भावनिक डॉक्यूमेंट्री दाखवण्यात आली. यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावंडांचे वेगवेगळे फोटो होते. दोन्ही भावंडांचे शिवसेना पक्षात काम करतानाचे काही क्षणचित्र होते, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे काही फोटो होते. या फोटोंच्या मागे एक अतिशय भावूक करणारं गाणं होतं जे त्या भावंडांचं नातं आणि दोस्ती ठळकपणे अधोरेखित करत होतं. या फोटोंवर बोलताना राज ठाकरे भावूक झाले.यावेळी अवधूत गुप्ते आणि राज ठाकरे यांच्यात भावनिक संभाषण झालं.

राज ठाकरे – खूप छान दिवस होते ते. माहित नाही मला, कुणीतरी विष कालवलं. किंवा नजर लागली. असो…

अवधूत – ते दिवस परत येऊ शकत नाही का?

राज ठाकरे – माहिती नाहीओ. विषय हा फक्त राजकीय नव्हता ना? आमच्या मनात काय, यापेक्षा आमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात काय, हे राजकारण खूप घाणेरडं असतं. दुर्देव! अजून काय?

अवधूत – तुमच्यातपण एक वाघ आहे. एवढं सगळं झालेलं असताना उद्धव यांना बरं नसताना गाडी काढली, मीडियाचा विचार न करता स्टेअरिंगवर बसले…

राज – मीडियाचा का विचार करायचा? मी कुणाचाही विचार करत नाही. मला ज्यावेळेला एखादी गोष्ट वाटते ती गोष्ट मी त्यावेळेला करतो. ती गोष्ट करत असताना मला कोणी थांबवू शकत नाही.

अवधूत – असंच गाडी काढून जा आणि हक्काने सांगाना, चल उद्धव, बास झालं आता,

राज – तुम्हाला काय वाटतं? हे झालं नसेल? जाऊदे!

अवधूत – जाऊदे म्हणजे…. आम्ही हिंतचिंतक आहोत

राज – हो, आम्हाला पण माहिती आहे

अवधूत – आम्ही तुमच्या दोघांचेच नव्हे महाराष्ट्राचे हितचिंतक आहोत.

राज – मला कल्पना आहे. बघू, नियतीच्या मनात उद्या काही असेल समजा…

अवधूत – त्यासाठी आम्ही सगळे गणपती पाण्यात ठेवायला तयार आहोत.

राज – हो… बघू

अवधूत – परवा, मुलाखतीत तुमच्या आईंना विचारलं की, उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? त्या म्हणाल्या, फार वाईट वाटलं. तुम्हाला?

राज – वाईट वाटलं, हा भाऊ म्हणून भाव झाला. पण मुख्यमंत्री म्हणून तुमचं लक्ष असायला पाहिजे होतं. इतकं सरळपणे, भाबडेपणे असेल किंवा तुमचं दुर्लक्ष असेल तर 40 लोकं तुमच्या हाताखालून निघून जातात हे सतर्क असलेल्या माणसाचं लक्षन नव्हे.

अवधूत – बरोबर आहे, पण तुम्ही ज्या हक्काने इतकं ठोकून सांगताय, असंच ठोकून सांगणारा एक भाऊ बाजूला नाही ना आता!

राज – नाही आता पवार साहेब बाजूला असताना, मी कशाला पाहिजे? इतकी हक्काची माणसं आता आजूबाजूला आहेत. बघू…

अवधूत – बघू म्हणजे आम्ही वाट बघतोय आणि स्पष्टच सांगतोय की आम्ही वाट बघतोय…

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us