Mumbai : सिद्धिविनायक मंदिरात दुर्दैवी घटना, उकळत्या पाण्याने भाजलेल्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू
Siddhivinayak Temple : मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवताना गंभीर दुर्घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवताना गंभीर दुर्घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उकळत्या पाण्याने भरलेला टोप अंगावर पडल्याने गंभीररीत्या भाजलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
जेवण बनवताना घडली होती दुर्घटना
समोर आलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवण्याचे काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. जेवण बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान उकळलेल्या पाण्याने भरलेला टोप अचानक संबंधित कर्मचाऱ्याच्या अंगावर पडला होता. या दुर्घटनेत कर्मचारी तब्बल 60 टक्के भाजला होता. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू होते उपचार
जखमी कर्मचाऱ्यावर गेल्या पाच दिवसांपासून उपचार सुरू होते. डॉक्टरांकडून त्याला वाचवण्यासाठी उपचार करण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान काल त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, दादर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
सिद्धिविनायक मंदिरात विविध कामांसाठी कंत्राटी कर्मचारी कार्यरत असतात. त्यामुळे स्वयंपाकाच्या ठिकाणी गरम पाणी, मोठी भांडी आणि इतर साहित्य हाताळताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होती का? कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी आणि सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मंदिर प्रशासन, कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासानंतर या दुर्घटनेमागील नेमकी कारणे समोर येण्याची शक्यता आहे.