मुंबई: केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात 12 कोटी, डिसेंबरपर्यंत 210 कोटी लसी उपलब्ध होईल, असे सांगणे किती योग्य आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. (NCP Leader Nawab Malik take a dig at Modi govt)
राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार याची माहिती दिली पाहिजे. केंद्र किती खरेदी करणार, राज्यांना किती मिळणार आणि खासगी लोकांना खरेदी करुन त्यांनी त्याचा वापर किती करावा याबाबतची स्पष्टता केंद्र सरकारने आजपर्यंत जाहीर केलेली नाही, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
कधी प्रकाश जावडेकर वेगळं बोलतात तर कधी जे. पी. नड्डा वेगळी घोषणा करतात.फक्त वेगवेगळ्या हेडलाईन होण्यासाठी हे लोक बोलत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. 12 कोटी लस पुरवठा जूनपर्यंत होणार होता, मात्र आजपर्यंत किती पुरवठा झाला असा सवाल करतानाच कालपर्यंत लसीकरण केंद्रे बंद होती. जी सत्यता आहे ती स्वीकारली पाहिजे आणि त्यानुसार कार्यक्रम बनवून देशासमोर ठेवावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपुर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
देशाचा जीडीपी उणे 7.5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बँकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळलं पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
(NCP Leader Nawab Malik take a dig at Modi govt)