‘बेस्ट’ वीज विभागाचा नफा परिवहनला का देता? राज ठाकरेंचे विद्युत नियामक आयोगाला पत्र

| Updated on: Jan 31, 2020 | 3:24 PM

बेस्टकडून विद्युत कायदा 2003 चे उल्लंघन होत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी पत्रातून केला आहे.

बेस्ट वीज विभागाचा नफा परिवहनला का देता? राज ठाकरेंचे विद्युत नियामक आयोगाला पत्र
Follow us on

मुंबई : मुंबईकरांवर लादल्या जाणाऱ्या वीज दरवाढीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवत ‘बेस्ट’ वीज विभागाचा नफा ‘परिवहन’ला का देता? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला (Raj Thackeray Letter to MERC) आहे.

बेस्ट उपक्रम गेली कित्येक वर्षे विद्युत पुरवठा विभागाला होणारा नफा हा कायमस्वरुपी तोट्यात असणाऱ्या परिवहन विभागाला वळता करत आहे. तसं न करण्यासाठी मनाई आदेश काढण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. बेस्टकडून विद्युत कायदा 2003 चे उल्लंघन होत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी पत्रातून केला आहे.

परिवहन विभागाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन असल्याची टिपण्णीही राज ठाकरेंनी या पत्रातून केली आहे. बेस्ट परिवहनचा तोटा महापालिकेने भरावा, वीज विभागाचा नफा परिवहनला देऊ नये, असे आदेश देण्याची मागणी राज ठाकरेंनी या पत्रातून केली आहे.

परिवहन विभागाला कोणत्याही प्रकारे कर सवलत, अनुदान किंवा टोलमाफी न देण्याची भूमिका आहे. तसेच मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात ‘बेस्ट’चा परिवहन विभाग विलीन करण्याचे आश्वासन न पाळल्याने विभागाचा तोटा दिवसागणिक वाढत चालला आहे, असा घणाघातही राज ठाकरेंनी केला आहे.

बेस्ट उपक्रमातील विद्युत विभागाचा नफा इतर कुठेही वळता न करण्याचे आदेश द्यावेत. कायद्यातील तरतुदीप्रमाणे नफा 1/3 समभाग पद्धतीने विद्युत ग्राहक यंत्र सामुग्री खरेदी तसेच आस्थापना-प्रशासकीय खर्च म्हणजेच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ते यासाठी देण्यात आला पाहिजे, असं पत्रात म्हटलं आहे.

मुंबईकरांवर वीज दरवाढीचा बोजा पडणार नाही यासाठी विद्युत नियामक आयोगाने ठेवलेल्या सुनावणीवेळी विस्तृत बाजू मांडण्यासाठी योग्य कागदपत्रांसह पक्षाचे शिष्टमंडळ उपस्थित राहील, असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray Letter to MERC) सांगितलं.