अरे त्या सरफराजला सांगा आणि…आर अश्विनने विजयाचं जुगाड सांगितलं; टीम इंडिया फॉलो करणार का?
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. पण या सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार हा प्रश्न आहे. सरफराज खानला संधी मिळेल का? यावरून खलबतं सुरू आहेत. या मुद्द्यावर आर अश्विनने आपलं रोखठोक मत मांडलं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. या मालिकेपूर्वीच संघात दोन बदल करण्यात आले आहे. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांच्या जागी आकिब नबी आणि सरफराज खान यांची नियुक्ती झाली आहे. आकिब नबीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे. पण सरफराज खानला संधी मिळेल की नाही? हा संभ्रम कायम आहे. ध्रुव जुरेलचा प्लेइंग 11 मध्ये दावा असल्याचं मत माजी क्रिकेटपटू आर अश्विनने व्यक्त केलं आहे. सरफराज खानच्या जागी ध्रुव जुरेलला प्लेइंग 11 संधी मिळेल, असं त्याने सांगितलं आहे. दुसरीकडे, त्याच्या फलंदाजी तंत्राचा दाखला देत आर अश्विन म्हणाला की, कर्णधार शुबमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर यांनी त्याला स्पष्टपणे सांगायला हवं.
आर अश्विन सरफराजबाबत काय म्हणाला?
आर अश्विनने एश की बात या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘मी ध्रुव जुरेलपासून सुरूवात करेन. साई सुदर्शनच्या दुखापतीमुळे सरफराज खानला संघात एन्ट्री मिळाली आहे. सरफराजसाठी स्पष्ट सागणं खूपच महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर तो विशिष्ट परिस्थितीत कमकुवत वाटत असेल तर तुम्ही त्याला स्पष्ट सांगणं आवश्यक आहे. त्याला सांगावं लागेल की तो उपखंडातील परिस्थितीत संघासाठी उपयुक्त आहे.’
‘सरफराज खानकडे स्पष्टता असेल तर तो इतर गोष्टींवर आपला वेळ वाया घालवणार नाही. चांगली फिरकी खेळण्यावर आपलं लक्ष केंद्रीत करू शकेल. तसेच उपखंडातील परिस्थितीशी जुळवून घेईल. त्यात आपली क्रिकेट कारकिर्द घडवेल. जर विशिष्ट परिस्थितीत तो चांगली कामगिरी करू शकत नसेल तर त्याला स्पष्टपणे सांगावं’, असं आर अश्विन म्हणाला.
सरफराज खान भारतीय संघातून शेवटचा नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला होता. त्याने सलामीच्या सामन्यात 150 धावा केल्या. पण पुढच्या दोन्ही सामन्यात त्याला काही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मलिकेत त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर सरफराजला संघातून वगळण्यात आलं. तेव्हापासून दीड वर्षांचा काळ लोटल्यानंतर संघात परतला आहे.
